विधानसभेचा निकाल जिव्हारी लागला, नाना पटोले घेणार मोठा निर्णय, काँग्रेसला धक्का

विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानतंर आता नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. यामुळे सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

विधानसभेचा निकाल जिव्हारी लागला, नाना पटोले घेणार मोठा निर्णय, काँग्रेसला धक्का
| Updated on: Nov 25, 2024 | 11:41 AM

Nana Patole Resign From Congress President : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असून महाविकासआघाडीचा सुपडासाफ झाला आहे. महायुतीला २३० जागांवर विजय मिळाला. तर महाविकासआघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागेल. राज्यात फक्त १६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. यामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानतंर आता नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. यामुळे सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या. तसेच अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. सध्या महायुतीच्या गोटात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

नाना पटोले हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत

तर दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर आता नाना पटोले हे दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी २४ नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीत नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी हायकमांडकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र अद्याप नाना पटोले यांचा राजीनामा काँग्रेसच्या हायकमांडने स्वीकारलेला नाही. त्यामुळे नाना पटोले हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.

नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभव झाला. या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे हे नेते पराभूत झाले होते. त्यामुळे या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे बोललं जात आहे. दरम्यान याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us