‘सनातन ही आतंकवादी संस्था, मी मुख्यमंत्री असताना सनातनवर देशव्यापी बंदी आणा अशी…’, पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया
"2011 ला आम्ही 1 हजार पानाची माहिती केंद्राकडे पाठवली होती. ज्या प्रवृत्तींनी गांधींचा खून केला त्याच प्रवृत्तींनी दाभोलकरांचा खून केला हे माझं पहिल स्टेटमेंट मी आज पुन्हा देत आहे. आमचं सरकार जाऊन 11 वर्ष झाली मग तपास का झाला नाही?", असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी कोर्टाने आज अखेर निकाल दिला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर 3 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांना 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दुसरीकडे वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर या तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. कोर्टाच्या या निकालावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलीय.
“11 वर्षांनी हा निकाल लागत आहे. पोलिसांनी पुरावा सादर न केल्याने 3 लोकांना सोडण्यात आलं आहे. हा एक कट होता. त्यात कोण सामील होतं? हे समोर आलं नाही. सनातन संस्थेचे कटात सामील होते, अस म्हंटलं होत. सनातन संस्थेच्या प्रवक्त्याच विधान ऐकलं. हा कट कुठं शिजला आणि मुख्य आरोपी कोण हे अजून समोर आलेलं नाही. ते दडपण्यात आलं असं मला वाटतं. सनातन संस्थेच्या तारा कुठे जुळतात का? हे समोर आलं नाही”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
‘सनातन संस्था ही आतंकवादी संस्था’, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
“सनातन संस्था ही आतंकवादी संस्था आहे. आम्ही सनातन संस्थेला मी मुख्यमंत्री असताना देशव्यापी बंदी आणा, अशी अधिकृत विनंती गृह मंत्रालयाकडे केली होती. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होण्यापूर्वी आम्ही 2 वर्ष आधी ही बंदी घालावी, अशी विनंती केली होती. हत्येनंतर आम्ही पुन्हा पत्र लिहिलं होतं”, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. “सनातन संस्थेचा कुठं हात होता हे समोर आलं नाही आणि सनातन संस्थेवर बंदी घालावी ही मागणी आजूनही केंद्राकडे प्रलंबित आहे. मी या निकालावर समाधानी नाही”, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
‘तपास योग्य झाला नाही’, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
“2 लोकांनी कबूल केलं आहे की, आम्ही गोळ्या घातल्या त्यांनाच शिक्षा झाली. नंतर देखील गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाली. त्यामुळे तपास योग्य झाला नाही. या चौकशीबाबत समाधान व्यक्त करण्याची कुठलीही गरज नाही”, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.
“2011 ला आम्ही 1 हजार पानाची माहिती केंद्राकडे पाठवली होती. ज्या प्रवृत्तींनी गांधींचा खून केला त्याच प्रवृत्तींनी दाभोलकरांचा खून केला हे माझं पहिल स्टेटमेंट मी आज पुन्हा देत आहे. आमचं सरकार जाऊन 11 वर्ष झाली मग तपास का झाला नाही? आम्हाला तपासला 5 ते 6 महिने मिळाले होते. कोणाच्या मागे लागा असं तेव्हा आम्ही अजिबात सांगितलं नव्हतं. या संस्थेच्या हलचाली गोवा, महाराष्ट्रमध्ये आहेत. ही माहिती मला तेव्हा आमच्या पथकाने दिली होती”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.