Loud speakers | मनसेच्या ‘ भोंगे बंद’मुळे हिंदूचेच नुकसान, त्र्यंबकेश्वर-शिर्डीची काकड आरती बंद, हे पाप कोणाचं? काँग्रेसचे सचिन सावंत यांचा हल्लाबोल

| Updated on: May 05, 2022 | 2:24 PM

देशातील भाजपा शासित राज्यांनी भोंग्यांबाबत बोटचेपी भूमिका घेतली यांचे कारण स्पष्ट आहे. केवळ महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या प्रयत्नात भाजपा व त्यांचे साथीदार महाराष्ट्राला बदनाम करत आहेत, हे दुर्दैव आहे अशी चिंता सावंत यांनी व्यक्त केली.

Loud speakers | मनसेच्या ‘ भोंगे बंद’मुळे हिंदूचेच नुकसान, त्र्यंबकेश्वर-शिर्डीची काकड आरती बंद, हे पाप कोणाचं? काँग्रेसचे सचिन सावंत यांचा हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लाऊडस्पिकरचा मुद्द्यावरून सुरु केलेले राजकारण हिंदूंचे नुकसान करणारे ठरतेय. मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या नादात हिंदूंच्या सण उत्सवातही आता भोंगे वापरावर मर्यादा येऊ शकतात. आता मुस्लीम समाजाने स्वतः पहाटेची अजान बंद केली आहे पण काकड आरतीही बंद झाली. या वादात मनसेमुळे (MNS) हिंदूचेच अधिक नुकसान झाले असून त्र्यंबकेश्वर आणि शिर्डीची (Shirdi) काकड आरती बंद झाली, हे पाप कोणाचे? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. मनसेच्या अल्टिमेटमनंतर राजकीय वातावरण तापले असताना मशिदींसोबत याचा परिणाम हिंदू धार्मिक तिर्थस्थळांवरही होत आहे. लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या शिर्डी साई मंदिरात तब्बल 70 वर्षानंतर विना लाउडस्पीकर काकड आरती पार पडली आहे. भाविकांची साईबाबांवर निस्सीम श्रद्धा आहे. शिर्डी ग्रामस्थही सकाळच्या काकड आरतीचा सुमधूर ध्वनी कानी पडल्यानंतर आपल्या दिवसाची सुरूवात करतात. संपूर्ण गावकोसात बाबांची आरतीचा सूर ऐकू येतो, त्यात आता खंड पडला आहे. त्यामुळे भाविक आणि ग्रामस्थामध्येही नाराजी पसरली आहे.

मशिदींप्रमाणेच मंदिरांचेही मोठे नुकसान

भोंग्यावरून सुरु असलेल्या राजकारणावर तोफ डागताना सचिन सावंत म्हणाले की, लाऊडस्पीकर प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे पालन करा असे म्हणत राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. भारतीय जनता पक्षानेही मनसेला साथ दिली. वास्तविक पाहता सर्वोच्च न्यायालयाने रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतच मर्यादा घालून डेसिबलवर नियंत्रण ठेवावे असे म्हटले आहे. त्यामुळे कोठेही या व्यतिरिक्त बंधन नाही. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले वा रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत कोणी वापर केला तर तक्रार करता येते. मुंबई पोलीस कायद्याच्या 38(1) अन्वये मुंबईतील पोलीस लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी देतात.
मुंबईत एकूण 2404 मंदिरे व 1144 मशिदी आहेत. कालपर्यंत यातील केवळ 20 मंदिराकडे परवानगी आहे. तर 922 मशिदींकडे परवानगी आहे. 5 मंदिरांचे व 15 मशिदींचे अर्ज प्रलंबित आहेत. सर्व भोंगे बंद करा हे मनसेचे ऐकले तर मस्जिदींबरोबर 2400 मंदिरांनाही भोंगे वापरता येणार नाहीत तसेच चर्च, गुरुद्वारा, बौद्ध मंदिरांनाही ते वापरता येणार नाही. वर्षभर सार्वजनिक उत्सवांनाही परवानगी मिळणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात तर जवळपास 15000 मस्जिद असल्या तरी 80,000 पेक्षा जास्त मंदिरे आहेत. मस्जिदी अनधिकृत म्हणून बोंब मारताना अनधिकृत मंदिरांचे प्रमाणही प्रचंड आहे हे विसरता कामा नये. मनसेचे अज्ञान किती आहे हे यातून दिसते.

‘मनसेची भूमिका बौद्धिक दिवाळखोरीतून’

राजकीय स्वार्थापोटी मनसेची भूमिका व बौध्दिक दिवाळखोरीतून आलेला हा अविचार योग्य का अयोग्य जनतेने ठरवावा, असं वक्तव्य सचिन सावंत यांनी केलं. पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत सर्वधर्मीय प्रतिनिधींनी मनसेच्या मागणीला निकराचा विरोध केला आहे. लाऊडस्पीकरचा मुद्दा हा राजकीय नसून सामाजिक आहे हे राज ठाकरे म्हणत असले तरी त्याला राजकीय किनार आहे हे लपून राहिलेले नाही. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला निशाणा बनवण्याच्या नादात मनसे व भाजपा दोघेही उघडे पडले असून राजकीय फायद्यासाठी सुरु केलेल्या या ‘भोंगे बंद’ मुळे हिंदू समाजाचे मोठे नुकसान होत आहे याचे त्यांना भान राहिले नाही असेही सावंत म्हणाले. देशातील भाजपा शासित राज्यांनी भोंग्यांबाबत बोटचेपी भूमिका घेतली यांचे कारण स्पष्ट आहे. केवळ महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या प्रयत्नात भाजपा व त्यांचे साथीदार महाराष्ट्राला बदनाम करत आहेत, हे दुर्दैव आहे अशी चिंता सावंत यांनी व्यक्त केली.