‘राहुल गांधी यांचे ‘मोहब्बत की दुकान’, ‘मोदी यांच्याविरोधात 25 पक्ष’, देवेंद्र फडणवीस यांची तुफान टोलेबाजी

एक नेता गरीब चहा विकणारा व्यक्ती मोदी यांच्या रूपाने पंतप्रधान झाला. त्यांनी ओबीसीचा विचार केला. देशातल्या या कणखर नेत्तृत्वाला थांबविण्यासाठी २५ पक्ष एकत्र आले. देशात मोदी यांना संपविण्यासाठी त्यांच्याविरोधात षडयंत्र रचले.

राहुल गांधी यांचे मोहब्बत की दुकान, मोदी यांच्याविरोधात 25 पक्ष, देवेंद्र फडणवीस यांची तुफान टोलेबाजी
PM NARENDR MODI, RAHUL GANDHI AND DEVENDRA FADNAVIS
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar | Updated on: Oct 13, 2023 | 9:50 PM

वाशिम : 13 ऑक्टोबर 2023 | भाजपच्या ओबीसी सेलच्यावतीने आयोजित ओबीसी जागर मोर्चा यात्रेचा समारोप वाशीममध्ये झाला. या समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी केली. सेवाग्राममध्ये ही यात्रा सुरु झाली आणि यात्रेचा समारोप पोहरादेवी या बंजारा समाजाच्या काशीमध्ये होत आहे. जागर घडविण्याचे काम तुम्ही केलं असे ते यावेळी म्हणाले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेसवर त्यांनी सडकून टीका केली. तर, राहुल गांधी यांची मोहब्बत की दुकान बंद पडेल, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यात अडीच वर्ष विकास बंद होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्तृवाखाली पुन्हा विकास सुरु झाला आहे. सरकारचे काम सुंदर होत आहे. ओबीसी समाजच्या विकासासाठी सरकार काम करत आहे असे ते म्हणाले.

देशात मोदी यांचे सरकार आले तेव्हा ओबीसी समाजावर खऱ्या अर्थाने फोकस सुरु झाला. या समाजाला सोई सुविधा दिल्या पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली. जेवढी चिंता मोदी यांनी केली तेवढी कुणी केली नाही. कॉंग्रेसने मंडल आयोग जाणीवपूर्वक दाबून ठेवला होता. कॉंग्रेसने सतत या आयोगाला विरोध केला. उद्धव ठाकरे यांच्यापक्षाने देखील त्याला विरोध केला होता, असे त्यांनी सांगितले.

मोदी यांनी ज्या योजना सुरु केल्या त्याचे लाभार्थी कोण आहेत. त्याचे ७१ टक्के लाभार्थी ओबीसी आहेत. किसान योजनेत ८० टक्के, प्रधान मंत्री आवास योजनेत ६० टक्के, विविध शिष्यवृत्ती ५८ टक्के लाभार्थी ओबीसी आहेत. आम्ही केवळ भाषण करत नाही तर खऱ्या अर्थाने त्यांच्या योजनाचा लाब ओबीसी समाजाला देत आहोत असे ते म्हणाले. सामाजिक न्यायाच्या गोष्टी करता. जितकी भागीदारी तितकी हिस्सेदारी म्हणता पण तो देता का? असा सवाल त्यांनी केला.

राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकान वरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. अलीकडच्या काळात राहुल गांधी यांना ओबीसींची आठवण येतेय. त्यांना आठवण येतेय ही चांगली गोष्ट आहे. आता त्यांनी ‘मोहोब्बत की दुकान’ खोलली आहे. प्रेम दुकानात कधी मिळलायला लागलं? प्रेम मनात असावं लागतं जे मोदींजींच्या मनात आहे. तुम्ही दुकानात कितीही उसणं प्रेम आणलं तरी तुमच्या दुकानात प्रेम घ्यायला कोणीही तयार नाही असा टोला त्यांनी लगावला.

तुमची मोहब्बत दुकान बंद झाल्याशिवाय राहणार नाही, कारण प्रेम हे मनात असावं लागतं. राहुल गांधी ते दुकानात कधीही मिळणार नाही. पण, यांची मोहब्बत की दुकान कशी आहे हे नागपूरमध्ये काँग्रेसच्या बैठकीत लक्षात आलं. काँग्रेसच्या दोन गटांनी एकमेकांच्या गचांड्या पकडून एकमेकाला ठोकठोकी केली. एकमेकांचे कपडे फाडले तेव्हा लक्षात आलं. राहुल गांधींची मोहब्बत की दुकान नागपूरपर्यंत पोहोचली आहे आणि अशीच ही दुकान चालणार आहे, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us