
ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा वाद केवळ स्थानिक कारवाईपुरता मर्यादित न राहता, आता थेट राज्याच्या गृहखात्याशी जोडला गेला आहे.
सावदा परिसरात वाळू आणि इतर गौण खनिजांची अवैध वाहतूक होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी काही वाहने पकडली होती. या कारवाईत काही निष्पाप लोकांना त्रास दिला जात असल्याचा दावा करत एकनाथ खडसे आक्रमक झाले होते. आपल्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर खडसे थेट सावदा पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये खालील प्रमुख बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षकांशी बोलताना खडसेंनी अरेरावीची भाषा वापरली आणि त्यांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच यावेळी संवादाच्या ओघात खडसेंनी राज्याच्या गृहमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह आणि अत्यंत खालच्या पातळीवरची विधाने केली.
तुमचे गृहमंत्री काय करतात ते मला माहित आहे, अशा आशयाचे वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. तसेच पोलीस ठाण्यात गर्दी जमवून पोलिसांवर दबाव आणण्याचा आणि त्यांना शासकीय काम करण्यापासून रोखल्याचा आणि सरकारी कामात अडथळा आरोप लावण्यात आला आहे.
एकनाथ खडसेंवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने सरकारी नोकराला धमकावणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे आणि मानहानीकारक वक्तव्ये करणे यांसारख्या कलमांचा समावेश आहे.
या कारवाईवर खडसे समर्थकांनी एक मोठा दावा केला आहे. ही कारवाई पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असून, खडसेंचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. जनतेचे प्रश्न मांडणे हा गुन्हा आहे का? असा सवाल त्यांच्या समर्थकांनी विचारला आहे. तर दुसरीकडे, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी पोलिसांशी आणि संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींशी बोलताना सभ्यता पाळायला हवी होती,” अशी टीका भाजपकडून केली जात आहे.