सत्तांतराच्या सात महिन्यातच शिंदे-फडणवीस सरकारच्या आमदारांमध्ये धुसफूस? कारण…

| Updated on: Feb 03, 2023 | 8:38 PM

विधान परिषदेच्या (MLC Election) पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अमरावतीच्या जागेवर भाजप आमदार रणजित पाटील यांचा पराभव झाला.

सत्तांतराच्या सात महिन्यातच शिंदे-फडणवीस सरकारच्या आमदारांमध्ये धुसफूस? कारण...
Image Credit source: social media
Follow us on

बुलढाणा : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) सात महिन्यांपूर्वी मोठा राजकीय भूकंप आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्या गटाने आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वातील भाजपने (BJP) महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणलं. हे सत्तांतर झालं, पण त्यानंतर वारंवार सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्ये (विशेषत: शिंदे गटाच्या आमदारांमध्ये) धुसफुसीच्या विविध चर्चा समोर येत असतात. महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होवून सात महिने झाले तरी मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. आमदारांची ही नाराजी वारंवार समोरही आलेली आहे. पण अजूनही विस्तार होताना दिसत नाहीय. विशेष म्हणजे आमदारांमधील ही धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आलीय.

विधान परिषदेच्या पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अमरावतीच्या जागेवर भाजप आमदार रणजित पाटील यांचा पराभव झाला. या पराभवावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आलीय. विशेष म्हणजे रणजित पाटील यांच्या पराभवावरुन शिंदे गटाच्या आमदाराने भाजपवर गंभीर आरोप केलाय.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी रणजित पाटील यांच्या पराभवावरुन भाजपवर आरोप केलाय. या निवडणुकीत आमच्या पक्षाचे दोन आमदार असूनही विश्वासात घेतलं गेलं नाही, असा आरोप संजय गायकवाड यांनी केलाय.

हे सुद्धा वाचा

संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?

“भाजपने अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे गटाचे दोन आमदार असूनही विश्वासात घेतलं नाही”, असा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलाय.

“शिंदे गटाला विश्वासात न घेतल्यामुळे भाजपच्या रणजित पाटील यांचा पराभव झाला”, असा स्पष्ट दावा संजय गायकवाड यांनी केलाय.

“बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार, खासदार आहेत. आम्हा कुणाला विश्वासात घेतलं गेलं नाही. आमच्याकडे एवढी मोठी कार्यकर्त्यांची फळी आहे. पण त्यांनासुद्धा विश्वासात घेतलं गेलं नाही”, अशा शब्दांत संजय गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली.

“आम्ही महिन्याभरापूर्वी मतदार याद्या मागितल्या. पण त्या मतदानाच्या चार दिवसआधी मिळाल्या. त्यामुळे मतदारांपर्यंत फार कुणी गेलं नाही”, असं संजय गायकवाड म्हणाले.

“आम्ही सहजपणे मतदारांच्या मतांची फेरफार जिल्ह्यामध्ये करु शकलो असतो. पण दुर्देवाने आमच्या लोकांना फार विश्वास घेतलं गेलं नाही”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

“एखाद्या पदवीधर मतदारसंघाचं आमदार म्हणून 12 वर्ष काम करताना सर्वांना खूश ठेवता येत नाही. पण विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल पाहिले तर या गोष्टीचे काहीसे पडसाद पडलेले बघायला मिळतात”, असंदेखील संजय गायकवाड म्हणाले.

शिंदे गटाच्या आमदारांनी याआधीही व्यक्त केलीय नाराजी

विशेष म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाही. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही यावरुन जाहीरपणे नाराजी व्यक्त केलीय. तसेच बच्चू कडू यांनीदेखील मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन नाराजी व्यक्त केलीय. आता संजय गायकवाड यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलीय.