
सुनील जाधव, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, कल्याण | 04 डिसेंबर 2023 : नुकतंच देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपला बहुमत मिळालं. यानंतर देशभर जल्लोष केला जात आहे. देशभरातील भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचं दिसत आहे. हा निकाल म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा असल्याचं भाजप कार्यकर्ते म्हणत आहेत. अशातच आता लोकसभा निवडणुकीतही अशाच विजयाचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. अशातच आता भाजप आमदाराने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्याच मतदार संघावर दावा केला आहे. निवडणूक निकालानंतर भाजपने कुरघोडीचं राजकारण सुरु केलं आहे का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यामुळे कल्याणमध्ये जल्लोष करण्यात आला. कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना लाडू भरवत जल्लोष केला. हा विजय उत्सव साजरा करत असताना गायकवाड यांनी मोठा दावा केला आहे.
आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप पक्ष आघाडीवर असेल. तसंच 100 % कल्याण आणि भिवंडी लोकसभेत जे आमचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे राहतील निवडून येतील, असं गणपत गायकवाड यांनी म्हटलं. त्यामुळे भाजप कल्याण लोकसभेला आपला उमेदवार देणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
कल्याण आणि भिवंडी लोकसभेत जे आमचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे राहतील आणि 100% निवडून येतील, असा दावा भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
दुसरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्वाचा दावा केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. तीन राज्यातील विजयानंतर भाजप आता कुरघोडीचं राजकारण करतंय का? अशी चर्चा होऊ लागली आहे.