GONDIA, DEVARI PROJECT : देवरीच्या आदिवासी विभागाने पेरला दिवाळीचा आनंद, गरजूंना फराळ, धान्य, कपड्यांचे वाटप
दिवाळीमध्ये आदिवासी आणि गरजूंच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, यासाठी देवरीच्या आदिवासी विभागानं मदत केली. फराळ, धान्य, कपडे मिळाल्याचा आनंद आदिवासी आणि गरजूंच्या चेहऱ्यावर झळकताना दिसला.
गोंदिया : एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाद्वारे आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृह यांचा व्हाट्सउप समूह तयार करण्यात आला. या माध्यमातून आदिवासी नक्षलग्रस्त भागातील अत्यंत गरजू आदिवासी समाजातील आणि इतर नागरिकांना मदत करण्यात आली. गरिबांनाही दिवाळीचा सण साजरा करता यावा म्हणून गोंदिया जिल्हातील आदिवासी बांधवाना जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्य भेट देण्यात आले.
कोरोनामुळे गेला होता रोजगार
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून आदिवासी भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी पुढे रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला होता. अनेकांचे कोरोनामुळे कुटुंब पोरके झाले होते. केवळ जंगलात पिकविणाऱ्या भाजीपाल्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. अशात विद्यार्थ्यांसमोर शैक्षणिक समस्या देखील होत्याच. अशा परिस्थितीत यंदाची दिवाळी या आदिवासी बांधवांसाठी गोड जावी म्हणून एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभाग देवरी येथील अधिकारी व कर्मचारी यांनी आदिवासी भागात भेटी दिल्या. या भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच उदर निर्वाहाकरिता जीवनावश्यक साहित्य देऊन आदिवासी बांधवांची दिवाळी गोड केली.
शिक्षक, मुख्याध्यापक, गृहपालांकडून मदत
एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाचे अप्पर आयुक्त ठाकरे तसेच गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनीही यासाठी सहकार्य केले. गोंदिया जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळांचं जाळ आहे. यात वसतिशाळा आणि आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आदिवासी भागातील गरजूंना मदत करायची असं ठरविण्यात आलं. गरिबांच्या घऱी दिवाळीचा उत्साह असावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. आपल्या आनंदातील थोडाचा आनंद वाटण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. गरजू हा कोणत्या जाती-धर्मचा आहे, याचा विचार केला गेला नाही. शिक्षक, मुख्याध्यापक, गृहपाल यांना यासाठी सहकार्य केलं. कुणी धान्य दिलं. कुणी फराळ दिला. तर कुणी कपडे पुरविले. शिवाय आणखी काही योजनांचा लाभ त्यांना देता येईल काय याचे नियोजन केले जात असल्याचं प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं.
गरजूंच्या घरी जाऊन केली मदत
गरजू आदिवासींसाठी खावटीचा उपक्रम शासनातर्फे राबविण्यात आला होता. त्याच्या कीटही याच कर्मचाऱ्यांनी वाटल्या होत्या. आता गरजूंपर्यंत पोहचून त्यांना भेटी देण्यात आल्या. या माध्यमातून गरजूंची माहिती या ग्रुपपर्यंत पोहचविण्यात आली. अधिकाऱ्यांनी आमच्यासाठी खाऊ आणला. पतीला दिसत नसल्याने मुलांचा सांभाळ करणाऱ्या महिलेलासुद्धा या भेटीने आनंद झाला. दिवाळीचा खाऊ आणल्याने त्यांचे मनापासून आभार मानत असल्याचं आदिवासी महिलेने सांगितले.
इतर संबंधित बातम्या