संभाजी महाराजांच्या नावाने लव्ह जिहादचा कायदा करा, गोपीचंद पडळकर यांची मोठी मागणी!

गोपीचंद पडळकर यांनी मोठी मागणी केली आहे. लव्ह जिहादचा कायदा हा संभाजी महाराज यांच्या नावाने करावा, असे त्यांनी म्हटलंय.

संभाजी महाराजांच्या नावाने लव्ह जिहादचा कायदा करा, गोपीचंद पडळकर यांची मोठी मागणी!
gopichand padalkar and love jihad law
| Updated on: May 31, 2025 | 4:10 PM

Gopichand Padalkar : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण तसेच ओबीसी आरक्षण कोट्यात मराठा समाजाचा समावेश करण्याची केली जाणारी मागणी या दोन बाबींमुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कायमच चर्चेत राहिलेला आहे. राज्यातील अनेक ओबीसी नेत्यांनी या दोन्ही मुद्द्यांमध्ये आपली सक्रीय भूमिका बजावलेली आहे. यात भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांचेही नाव आहे. त्यांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षमावर भाष्य केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण टिकवले, असं त्यांनी म्हटलंय. तसेच त्यांनी धर्मांतर आणि लव्ह जिहाद कायद्यावरही मोठी मागणी केलीय. संभाजी महाराज यांच्या नावाने लव्ह जिहाद कायदा करावा, अशी मोठी मागणी त्यांनी केलीय.

ओबीसींचे गेलेले आरक्षण शिंदे, फडणवीस यांनी टिकवले

गोपीचंद पडळकर हे अहिल्यानगरमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी वरील मागणी केली. मी आज काहीही मागणार नाही पण आरक्षणाचा विचार सर्वांच्या मनात आहे. ओबीसींचे गेलेले आरक्षण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी टिकवले. बाजीप्रभूप्रमाणे आम्ही सगळे प्रामाणिक आहोत. जे लढायचे ते समोरासमोर लढणारे आम्ही आहोत, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

संभाजी महाराजांच्या नावाने लव्ह जिहाद कायदा करावा

तसेच, लवकरच धर्मांतर बंदी, लव्ह जिहाद कायदा अस्तित्वात येणार आहे. यातील धर्मांत बंदी कायदा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने करायला हवा. तर लव्ह जिहादविरोधी कायदा संभाजी महाराजांच्या नावाने करावा, अशी मोठी मागणी त्यांनी जाहीरपणे केली.

इतिहासकारांनी त्यांचा इतिहास लिहिला नाही

अहिल्यादेवी यांनी कोणत्या जातीसाठी नव्हे तर देशासाठी कार्य केले. पण इतिहासकारांनी त्यांचा इतिहास लिहिला नाही. यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकर यांचा इतिहास लिहिला गेलाय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची जबाबदारी सुभेदार मल्हारराव होळकर यांनी घेतली, असा इतिहास यावेळी पडळकर यांनी सांगितला. आज अहिल्यादेवी होळकर यांची अनेक चित्र तयार झालेत. केवळ हातात पिंड दिलेला फोटो नव्हे तर घोड्यावर, हातात तलवार घेतलेले फोटो समोर येतायत, असं मत यावेली पडळर यांनी व्यक्त केला.

अहिल्यादेवी यांना 300 वर्षानंतर न्याय मिळाला

अहिल्यादेवी यांचे नाव भाषणात सांगणारे पण कृतीशून्य असलेले राजकारणी वेगळे आहेत. देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आणि राज्यभर अहिल्यादेवींची जयंती साजरी व्हायला लागली. आम्ही कायम आंदोलन करत होतो पण कोणी दखल घेत नव्हते. देशात होळकर घराण्यावर काही राजकारण्यांनी अन्याय केला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. केवळ एका वर्षात या सरकारने अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे केले. 1770 मध्ये अहिल्यादेवी यांनी काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर मोदीजींनी त्याच मंदिराचा जीर्णोद्धार केला. चोंडी येथे सभामंडप मिळवण्यासाठी 10 हेलपाटे घातले पण निधी लवकर मिळाला नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी एका झटक्यात 700 कोटी रुपयांचा निधी चोंडीसाठी दिला. अहिल्यादेवी यांना 300 वर्षानंतर न्याय मिळाला, असे मत पडळकर यांनी व्यक्त केले.