Farmer Scheme : आता शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला थेट लाभ, सरकारचा या योजनेसाठी सर्वात मोठा निर्णय; लाखो शेतकरी…

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस आणखी तीन वर्षांची मुदतवाढ देण्यास तसेच या योजनेत पात्र भूमिहीन शेतमजूर व महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

Farmer Scheme : आता शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला थेट लाभ, सरकारचा या योजनेसाठी सर्वात मोठा निर्णय; लाखो शेतकरी...
farmer new scheme
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 04, 2026 | 9:31 PM

Maharashtra Frame : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस आणखी तीन वर्षांची मुदतवाढ देण्यास तसेच या योजनेत पात्र भूमिहीन शेतमजूर व महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यापुर्वी ही योजना कुटुंबातील दोनच सदस्यांना लागू होती, आता ही योजना शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना लागू होणार आहे.

घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे…

शेती करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच, अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात, यामुळे मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व शेतकरी व खातेदार म्हणून नोंद नसलेल्या, शेतकऱ्याच्या कुटुंबातील १० ते ७५ वर्ष वयोगटातील कोणताही १ सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पति/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ति) अशा एकूण २ जणांकरिता सन २०२३-२४ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत होती. यात मृत्यू आणि अपंगत्व आल्यास दोन लाख ते एक लाखांपर्यंतची आर्थिक मदत देण्यात येते.

भूमिहीन शेतमजूरांचा अपघाती मृत्यू…

आता या योजनेस ३१ मार्च २०३१ पर्यंत मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. शेतीमध्ये प्रत्यक्ष राबणाऱ्या भूमिहीन शेतमजूरांचा वाटा मोठा असून, कामाच्या ठिकाणी त्यांनाही अपघाताचा धोका असतो. भूमिहीन शेतमजूरांचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवते. ही बाब विचारात घेता, या योजनेचे संरक्षण भूमिहीन शेतमजुरांनाही देण्यात येणार आहे.

कुटुंबातील सदस्यांनाही या योजनेचा लाभ

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत “महिला शेतकरी” म्हणून प्रमाणपत्र मिळालेल्या महिला शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेत अपघातामुळे झालेला अंतर्गत रक्तस्त्राव आणि उष्माघात या अपघातांचा नव्याने समावेश करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. योजनेसाठी यापुढे अपीलिय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्या ऐवजी अपर जिल्हाधिकारी राहतील. तसेच या योजनेत आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी दोन महिन्यांची मुदत राहणार आहे.

ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात येणार

आर्थिक मदत थेट लाभ हस्तांतरण (डिबिटी ट्रान्सफर) पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. त्यासाठी इंटिग्रेटेड ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us