
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी एका भीषण विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाजवळ लँडिंगदरम्यान झालेल्या अपघातात अजित पवारांसह विमानातील एकूण पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. सूंपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित दादा यांची रात्री झोपल्यापासून तर सकाळी उठ्यापर्यंतची दिनचर्या कशी असायची याबद्दलची आठवण सांगितली आहे.
“दादांना कुठल्याही पक्षाचा लेबल लावणं मला मान्य नाही”
गुलाबराव पाटील अजित दादांविषयी बोलताना म्हणाले, उद्या घालायचा ड्रेस त्यानंतर चप्पल हे सर्व दादा रात्रीच तयार करून ठेवायचे. सकाळी पाच वाजता उठायचे आणि सहा वाजेपासून ते कामाला लागायचे. अजित दादांना कुठल्याही पक्षाचा लेबल लावणं मला मान्य नाही कारण ते पक्षाचे नव्हतेच ते माणसांचे होते. त्यांनी पक्षाकडे बघून कधीच काम केली नाहीत. माणसांमध्ये माणसासाळलेला माणूस म्हणजे अजित दादा होते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
“या माणसाने खूनशी राजकारण केलं नाही”
पुढे ते म्हणाले, अजित दादांसोबतची मला खुप आठवण येते. कारण उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये, शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आणि फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये देखील मी अजित दादांसोबत होतो. आणि तिनही वेळेस अजित दादा अर्थमंत्री होते. प्रत्येक आमदाराची चावी त्यांच्याकडे होती. रागवायचे असेल तर रागवणार. मात्र, लगेच विसरून जाणार कधीही या माणसाने खूनशी राजकारण केलं नाही. त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झालेला आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये उपमुख्यमंत्री पद जरी आलेले असले तरी युद्धामध्ये सेनापती गेला तर मागच्याने तलवार हातात घ्यावी. त्याच पद्धतीचं काम या कुटुंबाने केलेलं आहे.
आपण कुटुंबाला किती वेळ देतो आपण आपल्या शरीरासाठी किती वेळ देतो याबाबत आपण दादांच्या घटनेतून बोध घेतला पाहिजे असे देखील गुलाबराव पाटील म्हणाले. ‘मी माझ्या बायकोसोबत एक किलोमीटरपर्यंत देखील प्रवास केलेला नाही. कोणी सांगून द्याव की गुलाबराव पाटलांची बायको गुलाबराव सोबत गाडीत दिसली. मायचा लाल असेल त्याने सांगून द्याव तुम्ही जे सांगेल ते हारून देईल मी. दादा गेले पण एकटे नाही गेले संपूर्ण महाराष्ट्र कोलमडला आहे. तुम्हाला याची झळ लक्षात येणार नाही महाराष्ट्रात असा नेता होणे नाही’ असे पुढे गुलाबराव पाटील म्हणाले.