हरियाणाने कॉंग्रेसचा खेळ विस्कटला, महाराष्ट्रात जागा वाटपात बसणार फटका ?

एकीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडी दसऱ्याच्या मुहूर्तावर आपले जागा वाटप जाहीर करणार असल्याचे म्हटले जात असताना मुख्यमंत्री पदावरुन महाविकास आघाडीत बिनसल्याचे म्हटले जात आहे. तर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसला तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा आम्ही त्याला पाठींबा देतो असे थेट आव्हानच दिले आहे.

हरियाणाने कॉंग्रेसचा खेळ विस्कटला, महाराष्ट्रात जागा वाटपात बसणार फटका ?
| Updated on: Oct 08, 2024 | 7:15 PM

हरियाणात भाजपाची हॅटट्रीक होत आहे. निवडणूकीत कॉंग्रेसला जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस महाराष्ट्रातील येऊ घातलेल्या विधानसभेच्या जागा वाटपात कमजोर पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे जागा वाटपात कॉंग्रेसला फारसा जोर दाखवत जागा मागता येणार नाहीत असे म्हटले जात आहे. आता हरियाणाच्या मोठ्या पराभवानंतर कॉंग्रेस महाविकास आघाडीत त्याच ताकदीने जागा मागू शकणार यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.कॉंग्रेसची बार्गेनिंग पॉवर या हरियाणातील पराभवाने कमी होणार असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसभा निवडणूकीत इंडीया आघाडीला चांगल्या जागा मिळाल्याने कॉंग्रेसला ऊर्जितावस्था प्राप्त झाल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे महाविकास आघाडीत कॉंग्रेसची ताकद वाढली होती. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीत विदर्भ आणि मराठवाड्यात कॉंग्रेसला जास्त जागा मिळाल्या होत्या. भाजपावर कॉंग्रेस हरियाणात सहज मात करेल असे म्हटले जात होते. जेव्हा आप सोबत कॉंग्रेसने आघाडी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कॉंग्रेसने ताठर भूमिका घेत पाच पेक्षा जास्त जागा सोडल्या नाहीत. याला कारण लोकसभेतील विजयाने कॉंग्रेसला आत्मविश्वास मिळाला होता.

महाराष्ट्र काय समीकरण?

लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीत झालेल्या जागा वाटपात सर्वाधिक जागा शिवसेना उद्धव गटाला मिळाल्या होत्या. ठाकरे गटाला 21 जागा मिळूनही केवळ 9 जागा प्रत्यक्षात मिळाल्या. कॉंग्रेसने 17 जागांवर निवडणूक लढली आणि 13 जागी विजय मिळविला. एनसीपी शरद पवार गटाने दहा जागा घेत आठ जागी विजय मिळविला. याच आधारे कॉंग्रेस महाराष्ट्रात जादा जागा मागत होती. कॉंग्रेस लोकसभेतील आपला स्ट्राईक रेट चांगला असल्याने आपल्याला जादा जागा हव्यात असे म्हणत होती.

मोठा भाऊ कोण ?

महाराष्ट्रात वर्षाअखेर विधानसभा निवडणूका आहेत. यासाठी जागा वाटपासाठी महाविकासआघाडीत अनेक बैठका झाल्या आहेत.परंतू अजूनही जागा वाटपाचे सूत्र निश्चित झालेले नाही.कारण कॉंग्रेस मोठा भाऊ बनायला पाहात आहे. महाराष्ट्रात 288 जागा आहेत. कॉंग्रेसने 100 ते 115 जागांवर दावा केला आहे. कॉंग्रेस सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याने तसेच त्यांच्याकडे 44 आमदारा असल्याने त्याला जादा जागा हव्यात अशी त्यांची मागणी होती. त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्हीत फूट पडलेली आहे. त्यामुळे कॉंग्रेस जादा जागांसाठी अडून बसली आहे. परंतू उद्धव ठाकरे आणि शरद पवार यास राजी नाहीत. ठाकरे हे मोठे भाऊ असल्याने त्यांना जादास जादा 100 जागा मिळाव्यात असे त्यांचे म्हणणे आहे. उर्वरित जागा दोन्ही गटाने वाटून घ्याव्यात असा फॉर्म्युला ठरला आहे.

कोणाच्या वाट्याला किती जागा

कॉंग्रेसला हरियाणा निवडणूकीत विजयाची आशा होती. त्यामुळे जागावाटपात वाट पाहीली जात होती. त्यात आता हरियाणात पराभव झाल्याने आता कॉंग्रेसला जादा जागा मागता येणार नाहीत असे म्हटले जात आहे. शरद पवार गट त्यामुळे कॉंग्रेसला जादा जागा देण्यासाठी विरोध करु शकतो. त्यामुळे कॉंग्रेसला आता आपल्या मागणीवर ठाम राहाता येणे बदलल्या परिस्थितीत वाटत नाही. त्यामुळे आता जागांवाटपात कोणाच्या वाट्याला किती जागा येतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us