राज्यात पावसाचा हाहाकार, हजारो हेक्टर पिकांचे नुकसान; कुठं काय पूरपरिस्थिती?

मानोरा परिसरात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे येथून वाहणाऱ्या खोराडी नदीला मोठा पूर आला. नदीच्या काठावर असलेल्या तालुक्यात बेलोरा येथे नदीच्या पुराचे पाणी गावात शिरले.

राज्यात पावसाचा हाहाकार, हजारो हेक्टर पिकांचे नुकसान; कुठं काय पूरपरिस्थिती?
Govinda Hatwar | Updated on: Jul 22, 2023 | 6:58 PM

मुंबई : गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. अजूनही काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आंबोली घाटामध्ये रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास दरड कोसळली आहे. मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर ही दरड कोसळली. घाटात सध्या एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी हाताने दरड हटवतानाचे चित्र आहे. जेसीबी किंवा कोणतीही यंत्रणेचा दरड हटवण्यासाठी वापर केला गेला नाही. कोसळलेली दरड 11 ते 12 तास होऊन गेले तरी अद्याप बाजूला करण्यात आलेली नाही.

बेलोरा येथे पुराचे पाणी शेतात

मानोरा परिसरात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे येथून वाहणाऱ्या खोराडी नदीला मोठा पूर आला. नदीच्या काठावर असलेल्या तालुक्यात बेलोरा येथे नदीच्या पुराचे पाणी गावात शिरले. लाखो रुपयांचे सामान, वस्तू पुरात गेले. तसेच नदीच्या काठावर असलेल्या शेतकरी मुंगसीराम उपाध्ये आणि सचिन उपाध्ये यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले. पिके वाहून गेली. लाखो रुपयांचे पिकं जमीनदोस्त झाले. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली.

ओढ्याला पूर आल्याने चार ते पाच गावांचा संपर्क तुटला

हिंगोली जिल्ह्यात रात्रीपासून कधी रिमझिम तर कधी जोरदार पाऊस होत आहे. छोट्या ओढ्या नाल्यांना पूर आला. सेनगाव तालुक्यातील कडोळी गावालगत असलेल्या पुलावरून पाणी वाहते. कडोळी गोरेगाव रस्ता बंद झाला. त्यामुळे कडोळी, गारखेडा तपोवन, यासह चार ते पाच गावांचा गोरेगावशी संपर्क तुटला. काही दुचाकी चालक स्वतःचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून मोटरसायकल काढताना दिसले.

रामसेतू पुलावरून 2 ते 3 फूट पाणी

अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. अकोला शहरातील मोरणा नदीला पूर आला, पुराचं पाणी राम-सेतु पुलावरून दोन ते तीन फूट पाणी वाहताना पाहायला मिळते. हा पूल जुने शहर आणि नवीन शहर या दोन शहरांना जोडणारा आहे. मात्र या पुलावर पाणी असल्या कारणाने आता या पूलावरून वाहतून बंद करण्यात आली. या नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला. रात्रीपासून अकोला जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेल्हारा तालुक्यातील अनेक भागांमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.

आहेरवाडी ते पाडला या गावांचा संपर्क तुटला

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात पुन्हा पुन्हा पावसाने जोर धरला आहे. यामुळे पुन्हा नद्या नाल्यांना पूर आलाय. नागोरी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने आहेरवाडी ते पाडला या दोन गावांचा संपूर्ण तुटला आहे. गावात पुराचे पाणी घुसल्याने ग्रामस्थांनी आपली गुरेढोरे सुरक्षित स्थळी हलवले आहेत.

पैनगंगेच्या पुरातून त्या तिघांची सुखरूप सुटका

नांदेडच्या माहूर तालुक्यातील टाकळी शिवारात पैनगंगा नदीच्या पुरात अडकलेल्या तिघांची सुखरूप सुटका करण्यात आलीय. एसडीआरएफच्या पथकाने सलग पाच तास अभियान राबवत भंडारी कुटुंबांला पाण्याबाहेर काढलं. तहसीलदार किशोर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हे बचावकार्य यशस्वीपणे राबवण्यात आलं. काल संध्याकाळपासून पुरात अडकलेल्या सुटका झाल्यानंतर या तिघांनी आनंद व्यक्त केला.

सकाळपासून शेगाव ते संग्रामपूर रस्ता बंद

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यात पावसाचा हाहाकार आहे. अद्यापही नदी नाल्यांना आलेला पूर ओसरला नाही. शेतात पाणी साचून आहे. जळगाव जामोद तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला. तर संग्रामपूर तालुक्यातील गावांना पुराचा फटका बसला. हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शेती वाहून गेलीय. संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्याचा संपर्क अद्यापही तुटला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us