Chandrakant Patil: राज ठाकरेंच्या आधीपासून आम्ही हिंदुत्वाचे मुद्दे मांडतोय; चंद्रकांत पाटलांच्या टोल्याचा नेमका अर्थ काय?

| Updated on: Apr 13, 2022 | 5:51 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. त्यामुळे राज ठाकरे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरण्याची चिन्हे आहेत.

Chandrakant Patil: राज ठाकरेंच्या आधीपासून आम्ही हिंदुत्वाचे मुद्दे मांडतोय; चंद्रकांत पाटलांच्या टोल्याचा नेमका अर्थ काय?
चंद्रकांत पाटील
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोल्हापूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाचा (hindutva) मुद्दा हाती घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. त्यामुळे राज ठाकरे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरण्याची चिन्हे आहेत. हा मुद्दा हातातून सुटू नये म्हणून शिवसेना आणि भाजपकडून हिंदुत्वावर वारंवार प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणामुळे हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्याची चर्चा असली तरी राज जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात ते भाजप खूप आधीपासून मांडत आहे. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. भाजपाचे कार्यकर्ते ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेतात तो संघ हिंदुत्वाचे हे मुद्दे सुरुवातीपासून मांडत आहे. राम मंदिर, समान नागरी कायदा, काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे कलम 370 रद्द करणे, नागरिकत्व कायद्यात सुधारणा हे मुद्दे भाजपा सुरुवातीपासून मांडत आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे. हिंदुत्वाचा मुद्दा भाजपकडून सुटू नये म्हणून पाटील हे विधान केलीय का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

चंद्रकांत पाटील हे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणांवर प्रतिक्रिया देतानाच शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुस्लिमांनी मशिदीत जरूर प्रार्थना करावी पण अजान मशिदीपुरतीच मर्यादित रहावी. हिंदुत्व म्हणजे मुस्लिमांवर आक्रमण नाही. पण त्याच वेळी त्यांचे लांगूलचालनही नाही. कोणी मशिदीत जाणे अथवा नमाज पढण्याला विरोध नाही. पण एकाच्या धर्माचा आदर करताना दुसऱ्याच्या धर्माचा आदर केला पाहिजे. इतरांवर धर्म थोपविण्याची आवश्यकता नाही, असे पाटील म्हणाले.

सामान्य माणूस काय म्हणतो हे महत्त्वाचे

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व बेगडी असल्याची टीका केल्याकडे पाटील यांचं लक्ष वेधण्यात आलं. उद्धव ठाकरे भाजपाच्या हिंदुत्वाबद्दल काय म्हणतात हे महत्त्वाचे नाही तर सामान्य माणूस काय म्हणतो हे महत्त्वाचे आहे. या देशातील हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि भाजपाने काय कार्य केले आहे याची सामान्य लोकांना जाणीव आहे.

आघाडीतून बाहेर पडण्याची हिंमत का होत नाही?

भाजपाने काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षासोबत युती करून सत्ता मिळविल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काश्मीरमध्ये निवडणुका होऊ शकत नाहीत आणि लोकशाही प्रक्रिया चालू शकत नाही, असे वातावरण दहशतवाद्यांनी निर्माण केले असताना केंद्र सरकारने तेथे निवडणुका घेतल्या. निवडणुकीनंतर लोकशाही प्रक्रिया टिकविण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा विचार करून मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत सरकार स्थापन केले. तथापि, मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाची वाटचाल पाकिस्तानधार्जिणी असल्याचे स्पष्ट झाल्याबरोबर भाजपा आघाडी सरकारमधून बाहेर पडली. काँग्रेस पक्षाच्या मुखपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केली तर शिवसेनेची आघाडी सरकारमधून बाहेर पडायची हिंमत का होत नाही, असा सवाल त्यांनी केला.

आस्तिक, नास्तिक हा ज्याचा त्याचा प्रश्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नास्तिक असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. त्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता आस्तिक असावे की नास्तिक असावे अथवा देव मानावा किंवा न मानावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. आपण त्याविषयी टिप्पणी करणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Gunratna Sadavarte: आधी गार्डनमध्ये नंतर मध्यरात्री सदावर्तेंच्या घरी बैठक, नागपूरची ती व्यक्तीही बैठकीला हजर, काय घडलं त्या रात्री?; कोर्टात धक्कादायक माहिती उघड

Jitendra Awhad: तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा दिसतोय ते आरशात पाहा; जितेंद्र आव्हाडांचं खोचक उत्तर

Raj Thackery Booked | ठाण्यातील सभेत तलवार दाखवणं अंगलट, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल