
राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानात मोठी चढउतार बघायला मिळत आहे. त्यामध्येच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ऐन फेब्रुवारी महिन्यात पाऊस होत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आहे. मात्र, त्या तुलनेत राज्यातील थंडी गायब झाली. उत्तरेकडे थंडी वाढली की, राज्यातही थंडीची लाट येते. मात्र, यावेळी फक्त डिसेंबर महिन्यात चांगली थंडी होती. त्यानंतर हळूहळू थंडी राज्यातून गायब झाली. 1 जानेवारी रोजी पाऊस आला, त्यानंतर राज्यातील तापमानात बदल होत आहे. फेब्रुवारी महिन्यात फार काही थंडी नसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने अगोदरच दिला. मात्र, काही शहरातील वायू प्रदूषण हा गंभीर मुद्दा बनल चालले आहे.
राज्यात सध्याच्या परिस्थितीला उकाडा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळत आहे. पावसाला पोषक वातावरणही निर्माण झाले. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा मोठा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, अहिल्यानगर, नंदूरबार, जळगाव, धुळे, नाशिक या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुण्यात काही दिवसांपासून शहरात किमान आणि कमाल तापमान किंचित घट झाली आहे तर पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. शहर आणि परिसरात किमान तापमानात किंचित घट होऊन 14° c इतके तर 31 इतके कमल तापमान नोंदवले. त्यामुळे सकाळी व रात्री गारठा जाणवत असून सायंकाळी ढगाळ वातावरण आहे.
मात्र दुपारी कडक ऊन पडत असून उकडा जाणवत आहे त्यामुळे पुणेकर सध्या एकाच दिवसात तीनही ऋतूंचा अनुभव घेत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला. वातावरणात सतत बदल होत असल्याने त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यामध्येच ऐन फेब्रुवारीत हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.