राज्यावर संकट! दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, मोठा इशारा, थेट..

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आजही पाऊस हजेरी लावणार आहे.

राज्यावर संकट! दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, मोठा इशारा, थेट..
Maharashtra Weather
| Updated on: Apr 25, 2026 | 7:14 AM

मागील चार दिवसात हवामानात मोठा बदल झाला. कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती आहे. मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दुसरीकडे कोकण आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. मुंबईमध्ये रात्री काही भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. सततच्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पुढील 24 तास मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. अमरावती येथे 44.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अकोला, रायगड, ठाणे, मुंबई, रत्नागिरी या भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. नागरिकांनी अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळा. परभणी, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

सतत बदलणाऱ्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर व परिसरात अचानक वातावरणात मोठा बदल होत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहू आणि पाऊस अशी स्थिती होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती.

अकोला शहरात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून तापमानाने पुन्हा एकदा 45 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने अकोला ‘हॉट सिटी’ म्हणून ओळख निर्माण करत आहे… तर आठवडाभरापूर्वीही तापमान 45 अंशांवर गेले होते, आणि आज पुन्हा त्याच पातळीची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा धोका वाढला असून, प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत असून आज यंदातील उच्चांकी 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत असून रस्ते अक्षरशः ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून प्रशासन सतर्क झाले आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता नागरिकांनी दुपारच्या वेळेत विनाकारण बाहेर पडू नये, पुरेशी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

Follow Us