ऑगस्ट महिन्यात कसा होणार पाऊस? भारतीय हवामान हवामान विभागाकडून थेट मोठा अंदाज, विदर्भात विजांच्या कडकडाटासह..

Maharashtra Rain Update : ऑगस्ट महिन्याला सुरूवात झाली असून पावसाने पाठ फिरवल्याचे बघायला मिळतंय. मात्र, आता नुकताच ऑगस्ट महिन्याच्या पावसाबद्दल अत्यंत मोठा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलाय.

ऑगस्ट महिन्यात कसा होणार पाऊस? भारतीय हवामान हवामान विभागाकडून थेट मोठा अंदाज, विदर्भात विजांच्या कडकडाटासह..
Rain
| Updated on: Aug 02, 2025 | 8:09 AM

दरवर्षीच्या तुलनेत राज्यात यंदा मॉन्सून लवकर दाखल झाला. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. काही भागांमध्ये पावसाची प्रतिक्षा कायम आहे. आता ऑगस्ट महिन्याला सुरूवात झाली असून या महिन्यात पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज अनेकांनी वर्तवला. मात्र, आता ऑगस्ट महिन्यातील पावसाबद्दल हवामान खात्याने मोठा अंदाज वर्तवला आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीला पाऊस चांगला झाल्याने पिक चांगली वाढली आहेत. मात्र, ऑगस्टमध्ये नेमका कसा पाऊस होतो, यावर शेतपिकांचे भविष्य ठरेल.

काल भारतीय हवामान विभागाकडून काही भागांमध्ये पावसाचा इशारा दिला होता. आजही विदर्भात विजांसह जोरदार पावसाचा इशारा काही भागांमध्ये देण्यात आलाय. फक्त, विदर्भच नाही तर कोकणातसही अलर्ट जारी करण्यात आला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशच्या काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावू शकतो. पुणे, मुंबई, सांगली, सातारा या भागातही पावसाच्या सरी कोसळू शकतात.

हवामान विभागाकडून आज विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. अनेक भागांमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. नागपूर, अकोला, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वाशिम या भागांमध्ये विजांच्या कडकडाटांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यातील धरण क्षेत्रांमध्ये चांगला पाऊस होताना दिसतोय. यामुळे धरणातील विसर्ग हा वाढवण्यात आला.

यंदाच्या वर्षी मान्सूनने अपेक्षेपेक्षा आधीच देशात आणि राज्यात प्रवेश करत दमदार सुरुवात केली होती. जून महिन्याच्या मध्यावर काहीसा खंड पडल्यानंतर जुलैमध्ये पावसाने पुन्हा जोर धरला. मात्र, जुलैच्या अखेरीस राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाला होता. पण आता ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्यात निर्माण झालेल्या पुर परिस्थितीमुळे 5 जणांचा मृत्यू तर 15 जनावरही दगावली आहेत.

तर 2 वेळा निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत 720 घरांचे व 250 जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले. प्रशासनाकडून नुकसानीची आकडेवारी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील महत्त्वाच्या चार धरणांमध्ये पाणी साठा खालीलप्रमाणे आहे. इटियाडो धरणामध्ये 98% पाणीसाठा, शिरपूर धरणामध्ये 70% पाणीसाठा, कालीसराळमध्ये 68% पाणीसाठा आणि पुजारी टोला धरणात 67% पाणीसाठा आहे.

या वर्षीच्या जुलैमध्ये मुंबई शहरात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले. 1 ते 31 जुलैदरम्यान कुलाबा केंद्रात 378.4 मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात 790.6 मिमी पावसाती नोंद झाली. गतवर्षीच्या तुलनेत या महिन्यातील पर्जन्यमानात लक्षणीय घट झाली. जुलैमध्ये कुलाबा केंद्रात 355.7 मिमी व सांताक्रूझ केंद्रात 65.1  मिमी कमी पाऊस झाला.

यंदा मोसमी पाऊस मुंबईत लवकर दाखल झाला. मात्र, पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होते. जूनमध्येही फारसा पाऊस झाला नाही. महिनाअखेरीस पडलेल्या पावसामुळे सरासरीइतका पाऊस नोंदला गेला. जुलैमध्येही जून महिन्यासारखीच स्थिती होती. जुलैच्या सुरुवातीचे 15 दिवस पाऊस पडला नाही. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या मात्र, मुसळधार पाऊस या कालावधीत पडलेला नाही. त्यानंतर साधारण 20 जुलैनंतर मुंबईत पाऊस सक्रिय झाला.

या कालावधीत मुसळधार पाऊस कोसळला. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात सलग दोन दिवस 100 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे सांताक्रूझ येथील आकडेवारीत वाढ झाली. मात्र, कुलाबा येथे मोठी नोंद झाली नाही. गतवर्षी जुलैमध्ये दोन्ही केंद्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात जुलै 2024 मध्ये 1401.8  मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात 1702.8 मिमी पाऊस नोंदला गेला होता.

खडकवासला धरणक्षेत्र 87.97 टक्के भरले आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणक्षेत्रात 25.64 टीएमसी पाणीसाठा म्हणजे 87.97 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या यावर्षी याचवेळी धरणात 26.46  टीएमसी पाणीसाठा म्हणजे 90.76  टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.