Indurikar Maharaj : 60 टक्के लोकांची जिंदगी मित्रांमुळे बरबाद.. इंदोरीकर महाराज काय बोलून गेले ?
प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा मित्रांवरील एक नवीन व्हिडीओ सध्या खूप गाजत आहे. ते म्हणतात की, "ज्याचे मित्र चांगले, त्याचा संसार चांगला, ज्याचे मित्र खराब, त्याचा संसार खराब." कीर्तनात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "60 टक्के लोकांची जिंदगी मित्रांमुळे बरबाद झाली आहे." मित्रसंगतीमुळे आयुष्यावर होणाऱ्या परिणामांवर इंदुरीकर महाराजांनी प्रकाश टाकला आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार म्हणजेच इंदोरीकर महाराज. निवृत्ती काशिनाथ देशमुख असं त्यांचं मूळ नाव असलं तरी ते सर्वत्र इंदोरीकर महाराज याच नावाने प्रसिद्ध आहेत. अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचे कीर्तन गाजते, हजारो लोकं त्यांचं कीर्तन ऐकायला गर्दी करतात. इंदोरीकर महाराज हे केवळ लोकप्रिय कीर्तनकार नाहीत, तर उच्चशिक्षितही आहेत. ते मूळचे अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यातील इंदोरी गावचे असून त्या गावाच्या नावावरूनच त्यांना इंदोरीकर महाराज म्हणून ओळखलं जातं.
गेल्या महिन्यात इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही विवाह झाला. अहिल्यानगर येथे थाटामाटात झालेल्या सोहळ्यात ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप लग्नबंधनात अडकले.त्यांच्या लग्नाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक राजकारणी तर आलेच पण हजारो लोकांनीही सोहळ्याला उपस्थिती लावत वधूवरांना आशीर्वाद दिले. इंदोरीकर महाराज यांच्याबद्दल तसेच त्यांच्या घरच्याबद्दलही जाणून घेण्याची लोकांना खूप उत्सुकता असतेच. मुलीच्या लग्नानंतर, त्यातील खर्चाबद्दल ते बोले होते. ज्याची बरीच चर्चा झाली.
दरम्यान आता इंदोरीकर महाराज यांचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. एका कीर्तनादरम्यानचा हा व्हिडीओ असून त्यातील त्याचं वक्तव्य खूपच गाजत आहे. मित्र कसे असावेत, याबद्दल इंदोरीकर महाराज हे बोलताना दिसले.
काय म्हणाले इंदोरीकर महाराज ?
या कीर्तनात इंदोरीकर महाराज हे मित्र, त्यांची संगतयाबद्दल बोलले. त्यांच्या संगतीने काय होतं, हेही ते सांगताना दिसले. ते म्हणाले, ‘ ज्याचे मित्र चांगले, त्याचा संसार चांगला. ज्याचे मित्र खराब, त्याचा संसार खराब. मित्र चांगले, त्याचं जीवन चांगलं, ज्याचे मित्र खराब, त्याचं सगळं खराब. आईचं दूध वाईट नाही, वडिलांचे विचार वाईट नाहीयेत आणि शिक्षकाचं शिकवणं वाईट नाहीये. अजून जगातल्या एकाही आईने मुलाला वाईट शिकवलं नाहीये. एकाही वडिलांनी मुलाला वाईट सल्ला दिला नाही. आणि एकाही शिक्षकाने अजून वाईट शिकवलं नाहीये. पण मित्राच्या संगतीमुळे माणसं संपलीत. तुमचं काय म्हणणं आहे ?’ असा सवाल इंदोरीकर महाराजांनी उपस्थितांना विचारला.
60 टक्के लोकांची जिंदगी मित्रांमुळे बरबाद
पुढे बोलताना इंदोरीकर म्हणाले, ‘ आई वाईट नाहीये, आईच दूध अमृत आहे, ते वाईट थोडचं असतं ? वडिलांचे विचार वाईट थोडीच ? असं कधीच नसतं. मित्र.. मित्र वाईट आहेत म्हणून आपण वाईट आहोत. 60 टक्के लोकांची जिंदगी ही मित्रांमुळे बरबाद झाली’ असं इंदुरीकर महाराजांनी या कीर्तनादरम्यान नमूद केलं. त्यांच्या या विधानाची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.
इंदोरीकर महाराजांचं शिक्षण किती ?
इंदोरीकर महाराज हे सायन्सचे पदवीधर आहे. त्यांनी बीएस्सी तसेच बीएड देखील केलं आहे. इंदोरीकर हे जर कीर्तनकार झाले नसते तर आदर्श शिक्षक म्हणून नावारुपाला नक्कीच आले असते. पण त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या डिग्री असूनही त्यांनी कीर्तन क्षेत्रात प्रवेश केला आणि अथक मेहनत करून ते प्रसिद्ध झाले. आपल्या नर्म विनोदी शैलीतून ते नेहमी समाजाचं प्रबोधन करतात. त्यांची ही नर्म विनोदी शैलीच त्यांची ओळख बनली. आपल्या नर्म विनोदी शैलीतून लोकांना हसवण्याचं काम ते करतात. इंदोरीकर महाराजाचं सामाजिक निरीक्षण अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. सध्या समाजापुढं सुरू असलेल्या विविध प्रश्नांवर ते त्यांच्या किर्तनात आसूड ओढतात. त्यांच्या खास बोली आणि देही शैलीमुळे, हावभावामुळे किर्तनाकडे तरुणही वळतात.