Jalgaon News : जळगावमधील पाळधी गावात सध्या परिस्थिती काय? संचारबंदी हटणार? थोड्याच वेळात मोठा निर्णय होणार

Jalgaon Paladhi Village Curfew : जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात नवीन वर्षालाचा गालबोट लागले. वाहनाचा धक्का लागल्याचे निमित्त झाले आणि दोन गटात तुफान हाणामारी झाली. त्याचे लोण दोन समूहातील भांडणापर्यंत गेले. वाहनं, दुकानं जाळण्यात आली.

Jalgaon News : जळगावमधील पाळधी गावात सध्या परिस्थिती काय? संचारबंदी हटणार? थोड्याच वेळात मोठा निर्णय होणार
जळगाव पाळधी संचारबंदी
| Updated on: Jan 02, 2025 | 4:28 PM

जळगाव जिल्ह्यातील पाळधी या गावात नवीन वर्षाचे स्वागतच हिंसेने झाले. वाहनाचा धक्का लागल्याचे निमित्त झाले आणि दोन गटात तुफान हाणामारी झाली. त्याचे लोण दोन समूहातील भांडणापर्यंत गेले. वाहनं, दुकानं जाळण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून या गावात संचारबंदी आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणातील आरोपींची धरपकड करण्यात आली आहे. तर काहींचा शोध सुरू आहे. पोलीस या ठिकाणी राहुटी ठोकून आहेत.

नेमकं घडलं तरी काय?

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी वाहनाने जात असताना, रस्त्यावरील काही तरुणांना त्यांच्या वाहनांचा धक्का लागला. चालक आणि तरुणांमध्ये बाचाबाची झाली. पुढे वाद वाढला. दोन गट आमने-सामने आले. 31 डिसेंबरला रात्री एक वाजेच्या सुमारास समाजकंटकांनी दोन ते तीन दुकाने पेटवून दिली तर तर काही दुकानांची तोडफोड करत नुकसान केले. अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचेपर्यंत पेटविण्यात आलेली सर्व वाहने आणि दुकान जळून खाक झाली होती. त्यानंतर गावात तणाव वाढला. पण वर्षाच्या पहिल्या दिवशी येथील गणपतीला भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

एकाला घेतले ताब्यात, इतर आरोपींचा शोध

मंत्री गुलाबराव पाटलांच्या कुटुंबातील वाहन चालकाच्या फिर्यादीवरून दाखल दुसरा गुन्ह्यांमध्ये एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपअधीक्षकांनी दिली आहे. तर दुसरा तोडफोड जाळपोळी संदर्भातला जो गुन्हा आहे त्यातील आरोपींची गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पडताळणी केली जात आहे.

थोड्याचवेळात शांतता समितीची बैठक

जळगावच्या पाळधी येथे दोन गटात वाद प्रकरणी गावातील दोन्ही धर्मीय, प्रतिष्ठित नागरिक जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक तसेच प्रांताधिकारी यांचे उपस्थितीमध्ये शांतता समितीची बैठक होणार आहे. आज सायंकाळी पाच वाजता पाळधी पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता समितीचे बैठक होणार आहे, त्यात पुढचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षकांनी दिली आहे

पाळधी येथे दोन गटात वाद झाल्याप्रकरणी लागू करण्यात आलेल्या संचार बंदीचा आज दुसरा दिवस आहे. रात्री आठ वाजेपर्यंत ही संचारबंदी सुरू राहणार आहे. दोन दिवसांची परिस्थिती लक्षात घेता आज संचारबंदी शिथिल करायची की पुढे कायम करायची याबाबतचा निर्णय प्रशासन घेणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us