‘सरकारचा ट्रॅप, बारसकर भोंदू महाराज’, मनोज जरागेंनी आरोपांवर उत्तर देताना घेतलं मुख्यमंत्र्यांचं नाव!

मराठा समाजाच्या आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपाला मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यावरच निशाणा साधलाय. पाहा काय म्हणाले?

सरकारचा ट्रॅप, बारसकर भोंदू महाराज, मनोज जरागेंनी आरोपांवर उत्तर देताना घेतलं मुख्यमंत्र्यांचं नाव!
| Updated on: Feb 21, 2024 | 6:24 PM

जालना :  मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले होते. मनोज जरांगे गुप्त बैठका घेतात, जरांगे यांना एक फोन आला आणि त्यांनी परत आंदोलनाला सुरूवात केल्याचं अजय महाराज बारसकर म्हणाले होते. या सर्व आरोपांना उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी थेट हा सरकारचा ट्र्रॅप असल्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच असे आणखी 15 ते 20 जण असल्याचं सांगत जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

माझ्यावर असेस आरोप रॅलीच्या आधीच होणार होते पण तो ट्रॅप फसला. अजय बारसकर हा बांधावरून उठला आणि महाराज झाला. तो भोंदू महाराज असून याच्या मागे कोणते नेते आणि मंत्री हे मला माहिती आहे. मी मराठा समाजासाठी कट्टर, बारसकर हा हेकेखोर आहे. सरकारने हे असे ट्रॅप लावणं बंद करावं नाहीतर याच्यापेक्षा आणखी जड जाईल. प्रत्येकाला सांगितलं होतं की ज्याला मध्यस्थी करायची त्याने स्वत:चा स्वार्थ पाहू नका. सरकारचा हा ट्रॅप असून मला बाजूला करण्यासाठी हे सर्व एकत्र माझ्याविरोधात भिडवणार आहेत.  मी जर तुकाराम महाराजांची खोटी माफी मागितली असेल तर मी भोगेन, असं मनोज जरांगे म्हणाले.

 तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होऊन माफी मागतो- जरांगे

माझ्याकडून काही शब्द गेले असतील तर मी संत तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होऊन माफी मागतो. बारसकर याच्या हाताने पाणी पिलो नाही या शब्दातच सर्व आलं. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा प्रवक्ता यामध्ये एकजण आहे. याला कोणी विचारत नाही, मला बदनाम करण्याचा सरकारकडून ट्रॅप आहे, अजय बारसकरने मला शिकवू नये, असं जरांगे यांनी म्हटलं आहे..

दरम्यान,  मला जर समाजाने बाजूला व्हायला लावलं तर लगेच एक मिनिटात बाजूला होतो. मला कसलाच मोह नाही. संत तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवायला जाऊ नका. तुम्हाला जे हवं होतं ते सरकारकडून मी मिळवून नाही दिलं म्हणून असे आरोप करू नका. हे पाप तुम्हाला भयंकर फेडावं लागेल. सरकारचा हा ट्रॅप आहे मराठा समाजात असे 10 ते 15 जण त्यातील एकजण बाहेर आल्याचं जरागेंनी सांगितलं.