Manoj Jarange Patil : भाजपाच्या त्या नेत्याची एन्ट्री झालीच! मनोज जरांगेंची मनधरणी करण्यासाठी नवा ॲक्शन प्लॅन; एक घोट तरी पाणी…

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण पाचव्या दिवशीही सुरू आहे, त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. सरकारने चर्चेचे संकेत दिले असले तरी जरांगे मागण्यांवर ठाम आहेत. आता भाजप नेता त्यांची भेट घेणार आहे. त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Manoj Jarange Patil : भाजपाच्या त्या नेत्याची एन्ट्री झालीच! मनोज जरांगेंची मनधरणी करण्यासाठी नवा ॲक्शन प्लॅन; एक घोट तरी पाणी...
Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 02, 2026 | 8:12 PM

ज्ञानेश्वर लोंढे , जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील उपोषणाला बसले असून, गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं दिसून येत आहे. आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड झाल्याचं चित्र आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण हळूहळू तापताना दिसत आहे. कालच सरकारच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं शिष्टमंडळाकडून सांगण्यात आलं. या भेटीनंतर सरकारी शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेत आंदोलनाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारची भूमिका मांडत चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे संकेत दिले.  मसुद्यावरून जरांगेंनी आपलं म्हणणं सांगावं, अशी सरकारची भूमिका आहे.  काही त्रुटी असतील तर त्याही दुरूस्त करू, असंही सरकारतर्फे सांगण्यात आलं.

मात्र, दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत मागे न हटण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

जरांगेंची मनधरणी करण्यासाठी नवा प्लॅन

दरम्यान, आता जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी सरकारकडून आणि राजकीय पातळीवर हालचालींना वेग येताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी रवाना झालेत. विशेष म्हणजे, ही भेट राजकीय न ठेवता वैयक्तिक आणि भावनिक पातळीवर करण्याचा प्रयत्न लाड यांच्याकडून केला जात आहे.

‘मी स्वतः गेल्यानंतर त्यांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांची भूमिका काय आहे आणि त्यांची प्रकृती कशी आहे, हे मला अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. उद्या मी माझ्या काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांची भेट घेण्यासाठी जाणार आहे,’ असं प्रसाद लाड यांनी म्हटलं. तसंच, ‘ खरं सांगायचं तर काल रात्रभर मला झोप लागली नाही. कारण ही भेट केवळ राजकीय नाही. मी आमदार म्हणून त्यांना भेटायला जात नाहीये. एक भाऊ म्हणून, त्यांचा मित्र म्हणून आणि समाजाचं लेकरू म्हणून मी त्यांना भेटायला जात आहे,’ असंही लाड यांनी स्पष्ट केलं.

एक घोट पाणी तरी..

जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करताना लाड म्हणाले की, त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या मनात काय आहे, हे जाणून घेणं आणि त्यांची प्रकृती सुधारावी, हीच आपली प्राथमिक इच्छा आहे. ‘त्यांनी आंदोलनाच्या काळात पाण्याचा त्याग केला आहे. त्यामुळे किमान एक घोट तरी त्यांनी पाणी प्यावं, अशी माझी अपेक्षा आहे,’ अशी भावनिक अपेक्षाही प्रसाद लाड यांनी व्यक्त केली.

आता प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात होणाऱ्या या भेटीत नेमकी काय चर्चा होते आणि जरांगे पाटील आपली भूमिका बदलतात का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us