आमदार व्हायचंय? काळजी करू नका, देवाभाऊकडे दैवीशक्ती आहे… बड्या मंत्र्याचं मोठं विधान

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींदरम्यान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदारकीसाठी महत्त्वाचे विधान केले आहे. 'देवाभाऊंकडे दैवी शक्ती असून, ती आमदार बनण्यास इच्छुक असलेल्यांना मदत करते,' असे ते म्हणाले. ठाकरे आणि शरद पवार गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांमध्ये हे विधान समोर आले आहे. विधान परिषद निवडणुकीतील मतांच्या हिशोबावरून त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजीही व्यक्त केली.

आमदार व्हायचंय? काळजी करू नका, देवाभाऊकडे दैवीशक्ती आहे... बड्या मंत्र्याचं मोठं विधान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
| Updated on: Jun 23, 2026 | 11:02 AM

राज्यात सध्या फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले असून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरेंनंतर शरद पवार गटाचे खासदारही फुटणार असल्याची चर्चा आहे. तसेच ठाकरे गटाचे आमदारही फुटणार असल्याचं बोललं जात आहे. शिंदे गटाकडून तर उघड उघडपणे तसं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज्यात आगामी काळात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं एक मोठं विधान समोर आलं आहे. तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर काळजी करू नका. देवाभाऊंकडे दैवीशक्ती आहे, असं विधान जयकुमार गोरे यांनी केलं आहे. त्यामुळे एकच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

ज्यांना आमदार व्हायची इच्छा, त्यांनी काळजी करू नये. देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे. ती शक्ती सगळ्यांचं समाधान करणारी आहे. त्यामुळे ज्यांना आमदार व्हायचे, त्यांनी काळजी करू नये, असे विधान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी मला, धैर्यशील कदम, अतूलबाबा, मनोजदादा अशा चौघांना तुम्ही विधानसभेत जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आम्ही चौघेही आमदार झालोत. प्रामाणिकपणे काम केल्यावर देवाभाऊ पाठीशी ठाम उभे राहतात आणि ज्यांना आता आमदार व्हायचं इच्छा आहे, त्यांनी काळजी करू नये, कारण देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे, असं जयकुमार गोरे म्हणाले. सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीतील धैर्यशील कदम यांच्या विजयानंतर सांगलीत आयोजित सत्कार समारंभ दरम्यान ते बोलत होते.

नक्की हिशोब करू, आम्ही हिशोबात पक्के आहोत

दरम्यान, सातारा- सांगली विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा उमेदवार विजयी झाला असला तरी फुटलेल्या 100 मतांवरून आता राजकारण तापू लागलेल आहे. या फुटलेल्या मतांवरून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता थेट निशाणा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर धरला आहे. कराड येथे त्यांनी माध्यमांशी बोलताना आम्ही नक्की हिशोब करू, हिशोबात आम्ही पक्के आहोत. अनेक लोकांच्या ओठात एक, मनात एक आणि करणीत आणखी वेगळं होत. परंतु, ते कोणालाही शक्य झाल नाही. तर पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद आबा महायुती सोबत राहिले का हे देवाला माहिती, असे म्हणत स्पष्ट नाराजी व्यक्त केली.

सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीत 301 मतांनी विजय मिळवल्यानंतर भाजपाचे नवनिर्वाचित आमदार धैर्यशील कदम यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Follow Us