पुण्यातील जेजुरीत भीषण अपघात; 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू

Jejuri vari accident : पुण्याच्या जेजुरीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत महिला सांगलीच्या असल्याचे कळतंय.

पुण्यातील जेजुरीत भीषण अपघात; 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू
| Updated on: Jul 13, 2026 | 10:18 AM

पुण्याच्या जेजुरीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. आषाढी वारीदरम्यान जेजुरीमध्ये सोमवारी सकाळी भीषण दुर्घटना घडल्याचे समोर आलं आहे. एका भरधाव टेम्पोने वारकऱ्यांच्या दिंडीला धडक दिली. या घटनेत 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज संत ज्ञानेश्वरांची पालखी सासवडच्या दिशेने प्रस्थान होत आहे. या वारीवर भंडाऱ्याची उधळण केली जाते. याच वारीतील टेम्पो चालकाकडून अनियंत्रित झाला. त्यानंतर हा टेप्म्पो एका दिंडीत घुसला. या दिंडीत महीलांसहित पुरुष वर्ग होता. टेम्पोच्या धडकेमुळे अनेक वारकरी गंभीर जखमी झाले. याच दिंडीतील तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी वारकऱ्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघात नेमका कसा घडला?

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडवरून जेजुरीच्या दिशेने प्रस्थान झाली. ही पालखी जेजुरी दाखल झाल्यावर भंडाऱ्याची उधळण केली जाते. याचदरम्यान वारीतील एका टेम्पो दिंडीत घुसला. या टेम्पोने वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. भरधाव टेम्पोने दिंडीतील अनेक वारकऱ्यांना चिरडलं. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर दोन जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. सासवड-जेजुरी रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे अनेकांची एकच धावाधाव झाली. टेम्पो अचानक अनियंत्रित कसा झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मृत महिला सांगलीच्या

जेजुरीजवळ सासवडे गावात अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. एका प्रत्यक्षदर्शीनुसार, भरधाव टेम्पो अचानक दिंडीत घुसला. या टेम्पोच्या धडकेत 15 ते 16 वारकरी जखमी झाले. त्यातील तिघांचा मृत्यू झाला. तर काही गंभीर जखमी आहेत. त्यातील काहींची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमधील महिला सांगलीच्या दिग्रस परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची दुर्घटनेवर ‘एक्स’ पोस्ट जशीच्या तशी

‘आज सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातात ज्या तीन वारकरी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही, याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्याची काळजी घ्यावी. जखमी भगिनी लवकर बऱ्या व्हाव्यात, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना’, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.

रोहित पवार काय म्हणाले? 

अपघातानंतर आमदार रोहित पवार यांनी पोस्ट करत म्हटलं की, दिंडीतील वाहनानेच धडक दिल्याने जेजुरीजवळ ३ वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि दुःखद आहे. या दुर्घटनेत काही वारकरी जखमी झाले आहेत. जखमी वारकरी लवकर बरे व्हावेत, ही श्री विठुरायाच्या चरणी प्रार्थना! हा अपघात कसा झाला याची सखोल चौकशी व्हावी. तसेच पुन्हा अशी घटना घडू नये याची दक्षता घेऊन प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी, ही विनंती’.

 

Follow Us