Jitendra Awhad : गरब्याचा वाद, अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले…
Jitendra Awhad News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी गरब्यावरून राज्यात राजकारण करु नये असं म्हणतं अमृता फडणवीसांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.

राज्यामध्ये गरब्यावरुन राजकारण सुरु आहे. आता यामध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गरब्यावरुन व्यक्त केलेल्या मतानंतर आता एनसीपी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. “मी अमृता ताईंचं समर्थन करतो. त्यांचं मनापासून स्वागत करतो की, त्यांनी भूमिका घेतली. याबाबत प्रत्येकाला भूमिका घ्यावी लागणार आहे. दोन समाजात किती द्वेष वाढवायचा. मला वाटतंय याचावर कोणी बोलू नये. दोन समाजात विषारी वातावरण किती करणार? हे देशाचा आणि राज्याचा हेतूने योग्य नाही. हा सर्व मतांच्या ध्रुवीकरणासाठीचा त्यांचा पूर्वीपासून अजेंडा आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नवरात्रौत्सवात गरब्याला सुरुवात होईल. त्यावेळी गरब्यांमध्ये मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, ज्यांच्या डोक्यावर टिळा असेल त्यांनाच प्रवेश मिळावा, असे मत कांदिवली मतदार संघाचे आमदार अतुल भातखळकर यांनी माडंले होते. तर अमृता फडणवीस म्हणालेल्या की, “आपला उत्सव सर्वसमावेश आहे. एखादी मुस्लिम व्यक्ती जर गरब्यात येत असेल आणि नीट आनंद घेऊन जात असेल, तर त्यात काही गैर वाटत नाही.”
दरम्यान, गणेशोत्सवाची कामे गैरहिंदूंना देऊ नयेत, या भाजप नेते अशोक शेळके यांच्या भूमिकेवरही उत्तर दिलं. ते म्हणाले की, “हे बरोबर नाही. असं तुम्ही जर जाती जमातीवर आधारित भूमिका घेऊ लागले तर या देशाला आपण विघटनाकडे नेतोय. समाज एक राहिला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. माझ्या घरी दिवाळी असेल तर दुसरे आपल्या घरी आले पाहिजे. कोणाकडे येशूचा उत्सव असेल तर आपण त्यांच्या घरी जायला पाहिजे. अचानक राजकीय फायद्यासाठी जर हे तुम्ही करू लागलात तर ते योग्य नाही.
याशिवाय आव्हाडांनी यावेळी इतरही अनेक मुद्यांवर भाष्य केलं, ओबीसी जनगणनेवर म्हणाले की, “संसदेमध्ये सरकारने शब्द दिला होता पण आता सरकार घाबरतय का? ओबीसी जनगणना का होत नाही? बिहारमध्ये झाली ओबीसी जनगणना, पूर्ण देशात हीच परिस्थिती असेल. ओबीसी जणगणना करायला कशाची भीती आहे .सरकार कोणालाही दाबून टाकते, त्यात काही नवीन नाही. तुम्ही संसदेत शब्द दिलाय तरी देखील तुम्ही पूर्ण का करत नाही?, असा सवाल त्यांनी केला.
ब्रिक्समधून काही फायदा होतो की तोटा होतो. नोकऱ्या मिळतील का नाही, महागाई कमी झाली का नाही, बाजारात कुठे काही स्वस्त मिळतंय का नाही, हेही पाहावं लागेलं, असं आव्हाड म्हणालेत.