“मुख्यमंत्र्यांच्या सावरकर यात्रेने उपस्थित केलेले प्रश्न सुटणार का?”; राष्ट्रवादीच्या खासदाराचा शिंदेंनाच प्रतिसवाल

| Updated on: Mar 28, 2023 | 9:31 PM

सावरकर यात्रेवरून अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छेडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य झाली होती.

मुख्यमंत्र्यांच्या सावरकर यात्रेने उपस्थित केलेले प्रश्न सुटणार का?; राष्ट्रवादीच्या खासदाराचा शिंदेंनाच प्रतिसवाल
Follow us on

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. काँग्रेस आणि भाजपकडून दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आणि लोकसभेने त्यांची खासदारकी रद्द केल्यामुळे जोरदार वाद सुरू झाला आहे. काँग्रेस आणि भाजपकडून राज्यभर आंदोलन सुरु आहे. तर कोल्हापूर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मला आदर आहे.

मात्र सध्याच्या काळात सावरकरांकडे मुद्दा घेऊन जाण्यापेक्षा लोकशाहीकडे घेऊन जाण्याची गरज असल्याचा टोला सावरकरप्रेमींना त्यांनी लगावला आहे.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केल्यानंतर भाजपने त्यावरून आता राजकारण सुरु केले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सावरकर यात्रेवरून अमोल कोल्हे यांनी त्यांना प्रतिसवाल केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सावरकर यात्रेने राहुल गांधींनी लोकसभेत उपस्थित केलेले प्रश्न सुटणार आहेत का असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर भाजपवर चहूबाजूनी टीका केली जात आहे. त्यांच्या खासदारकी रद्द झाल्यावरून चाललेल्या राजकारणावरही अमोल कोल्हे यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईची क्रोनोलॉजी तपासण्याची गरज आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईवरून आता लोकशाही जिवंत आहे का हा सवाल आता उपस्थित होत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

सावरकर यात्रेवरून अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छेडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य झाली होती.

त्यावेळी का यात्रा काढल्या गेल्या नाहीत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.त्यामुळे कोणत्याही महापुरुषांबद्दल सध्या राजकारण आणू नये असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.