Raigad Landslide : मुंबई गोवा महामार्गावर चोळई येथे दरड कोसळली, 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

मुंबईसह कोकणात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कशेडी घाटात रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या कामामुळे डोंगराचा काही भाग कापण्यात आला आहे.

Raigad Landslide : मुंबई गोवा महामार्गावर चोळई येथे दरड कोसळली, 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
मुंबई गोवा महामार्गावर चोळई येथे दरड कोसळली
Image Credit source: TV9
| Updated on: Jul 04, 2022 | 7:23 PM

रायगड : सकाळपासूनच सुरू असणाऱ्या धुवाँधार पावसामुळे कशेडी घाटा (Kashedi Ghat)तील चोळई येथे दरड कोसळली (Land Slide) आहे. घटनेची माहिती मिळताच सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चोळई येथे 20 कुटुंबे राहतात. पुन्हा दरड कोसळून जीवितहानीची शक्यता आसल्याने येथील गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी (Safe Place) हलविण्यात आले आहे. येथील 20 कुटुंबातील सुमारे 75 नागरिकांना पोलादपूर येथे हलवले आहे. या नागरिकांची तात्पुरती व्यवस्था विद्या मंदिर पोलादपूर येथे करण्यात आली आहे. मुसळधार पाऊस आणि पावसाळ्यातील दुर्घटना लक्षात घेत प्रशासन सतर्क झाले आहे.

गावाला धोका निर्माण झालाय

मुंबईसह कोकणात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कशेडी घाटात रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या कामामुळे डोंगराचा काही भाग कापण्यात आला आहे. पावसामुळे दरडीचे ढिगारे आणि दगड, माती या ठिकाणी कोसळत असल्याने या गावाला धोका निर्माण झाला आहे. हा धोका लक्षात घेत तालुका प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

दक्षिण रायगडात दुपारपासून धो धो पाऊस

मंगळवारपासून मानसून सक्रिय होणार असून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. मात्र आज दुपारपासून महाड माणगाव पोलादपूर या तालुक्यात धो धो पाऊस बरसत आहे. नाले सखल भागात शेतीमध्ये पाणी साचले आहे. या धो धो पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. असे असले तरी परिसरातील बळीराजा मात्र धो धो पाऊस पडत असल्याने सुखावला आहे. तर या धो धो पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर जवळील चोळई गावाच्या हद्दीत 4 च्या सुमारास दरड कोसळण्याची घटना देखील घडली असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत आहे. (Land slide at Cholai on the Mumbai Goa highway, evacuating 75 civilians)