Bhaskar Chandanshiv : खेड्यापाड्यातील जगणं मांडणारा साहित्यिक हरपला, भास्कर चंदनशिव यांचे निधन

Bhaskar Chandanshiv Passed Away : ग्रामीण भागातील जीवन आपल्या लेखनीच्या माध्यमातून मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचे निधन झाले आहे. लाल चिखल या कथेमुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले होते.

Bhaskar Chandanshiv : खेड्यापाड्यातील जगणं मांडणारा साहित्यिक हरपला, भास्कर चंदनशिव यांचे निधन
Bhaskar Chandanshiv
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Sep 28, 2025 | 5:41 PM

Bhaskar Chandanshiv Passed Away : ग्रामीण भागातील जीवन आपल्या लेखनीच्या माध्यमातून मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचे निधन झाले आहे. त्यांची ‘लाल चिखल’ ही कथा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली होती. शनिवारी भास्कर चंदनशिव यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने साहित्यक्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

भास्कर चंदनशिव यांचे शनिवारी निधन झाले. लातूर मधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भास्कर चंदनशिव हे त्यांच्या लेखणी प्रसिद्ध होते. भास्कर चंदनशिव हे 28 वे मराठवाडा साहित्य समेलन धाराशिवचे अध्यक्ष होते. त्यांनी राष्ट्रीय शेतकरी साहित्य संमेलनाचे देखील अध्यक्षपद भूषविले होते. त्यांचे जांभळढव्ह (1980), मरणकळा (1983), अंगारमाती (1991), नवी वारुळ (1992), बिरडं (1999) हे कथासंग्रह चांगलेच गाजले. ग्रामीण जीवनातील दुष्काळ, शेतकरी जीवन, आणि सामाजिक संघर्ष यावरील त्यांचे लिखाण हृदयस्पर्शी होते. लाल चिखल या कथासंग्रह याचेच एक उदाहरण.

वाचा: धक्कादायक! अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा शॉर्ट सर्किटमुळे गुदमरून मृत्यू

भास्कर चंदनशिव यांच्याविषयी

भास्कर चंदनशिव यांचे खरे नाव भास्कर देवराव यादव होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1945 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील हासेगाव (ता. कळंब) येथे झाला होता. भास्कर देवराव यादव हे दत्तकविधानामुळे पुढे भास्कर तात्याबा चंदनशिव या नावाने ओळखले जाऊ लागले होते. वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी लेखनास सुरुवात केली होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे कळंब येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अंबाजोगाई येथे गेले. एम.ए.ची पदवी मिळवण्यासाठी ते छत्रपती संभाजी नगर येथे गेले होते. 1972 मध्ये वरिष्ठ महाविद्यालयात मराठी प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. 2005 साली बलभीम महाविद्यालय, बीड येथून ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी कळंब येथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल राज्य पातळीवरही घेण्यात आली. ते काही काळ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य होते.

अनेक पुरस्काराने सन्मान

भास्कर चंदनशिव यांना आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आचार्य अत्रे पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा ग्रामीण साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमयनिर्मिती पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता.