मनोज जरांगे पाटील यांच्या मागे नक्की कोणाचा हात? लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा, म्हणाले संपूर्ण यादी…

सोलापूर येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे, देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रसाद लाड यांच्यावर तीव्र शब्दांत घणाघाती हल्ला चढवला असून, सरकारने ओबीसींच्या अन्नात माती कालवल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागे नक्की कोणाचा हात? लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा, म्हणाले संपूर्ण यादी...
laxman hake manoj jarange
| Updated on: May 24, 2026 | 11:34 AM

महाराष्ट्रात महायुती सरकार आल्यापासून एकाही ओबीसीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. मनोज जरांगेसारखा खुळचट माणूस आंदोलनाला बसतो आणि सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करते. या लोकनियुक्त सरकारने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण पूर्णपणे संपवले असून आमच्या अन्नात माती कालवण्याचे काम केले आहे, असा घणाघात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला. ते सोलापुरात बोलत होते.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजप, मनोज जरांगे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. यावेळी लक्ष्मण हाकेंनी निधी वाटपावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट टार्गेट केले. ओबीसी समाजाला बजेटमध्ये ५० टक्के निधी मिळणे अपेक्षित आहे. मात्र देवेंद्र फडणवीसांनी १ टक्क्यापेक्षाही कमी निधी दिला. राज्यात अनेक महामंडळे स्थापन केली, पण त्यांना अद्याप निधी किंवा सचिव मिळाला आहे का? हा केवळ निवडणुकीचा जुमला होता का?” असा सवाल त्यांनी केला.

प्रसाद लाड हरामखोर आमदार; लाडला पाठवून भाजपने सेल्फ गोल केला

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या विधानाचाही लक्ष्मण हाके यांनी समाचार घेतला. यावेळी त्यांनी अत्यंत आक्रमक भाषा वापरली. प्रसाद लाड नावाचा हरामखोर आमदार म्हणतो की हत्ती अख्खा गेलाय आणि आता शेपूट राहिले आहे. लाड यांनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग बोलावे. लाड सारखी टीनपाठ, हॉटेलवाली, झाडूपोछा करणारी माणसे मनोज जरांगेकडे जातात. लाडला जरांगेकडे पाठवून सरकारने स्वतःचा सेल्फ गोल केला आहे. लक्ष्मण हाके कोण? असे विचारणाऱ्या लाड यांनी सांगावे की मनोज जरांगे कुठला लोकप्रतिनिधी आहे? असा सवालही लक्ष्मण हाके यांनी केला.

मनोज जरांगे याला ओबीसी आणि दीनदलितांबद्दल काय माहिती आहे? मराठा समाज मागास आहे असे कोणत्या गॅझेटियरमध्ये लिहिले आहे? मराठा समाजावर कोणत्या समाजाने अन्याय केला हे त्यांनी जाहीर करावे. मनोज जरांगेच्या समाजाने आमच्या नंदीवाले समाजासारखी कधी हातात हलगी घेतली आहे का? की कधी कात्री घेऊन रस्त्यावर उतरले आहेत? श्रीमंत झाला म्हणून आरक्षण काढावे किंवा गरीब झाला म्हणून आरक्षण द्यावे, असे संविधानात नाही, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

मनोज जरांगेच्या पाठीशी असणाऱ्यांची यादी आमच्याकडे

आम्ही राजेश टोपेची जिरवली. त्यांना एक सरपंचही निवडून आणता आला नाही. दोन महिने आधीच आम्ही आव्हान दिले होते. मनोज जरांगेच्या मागे महायुती आणि विरोधकांमधील कोणकोणते नेते आहेत, याची संपूर्ण यादी आमच्याकडे आहे. योग्य वेळ आल्यावर आम्ही ती नावे समोर आणू. मनोज जरांगेसारख्या व्यक्तीमुळे दिशाभूल झाल्यानेच त्याने आत्महत्या केली असावी, लोकशाहीत असे घडू नये, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले.

सातसमुद्रापारून आलेल्या इंग्रजांनी या देशात जातनिहाय जनगणना केली, पण इथल्या राज्यकर्त्यांना ती करता आली नाही. आमचा इम्पिरिकल डेटा नसल्याने आम्हाला मोजले जात नाही, त्यामुळे आम्ही भयभीत आहोत. आमच्या हक्काचा निधी आम्हाला मिळत नाही. एकीकडे कोस्टल रोड आणि समृद्धी महामार्ग होतो, मग सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्यांचे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अजित पवारांनी पक्षाची ‘पवार प्रायव्हेट लिमिटेड’ केली आहे, तर शरद पवारांनी कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेच्या घटनेत बदल करून स्वतः अध्यक्ष झाले आणि रोहित पवारला उत्तर विभागाचा अध्यक्ष केले. भाजप आता ‘जेन झी’ पिढीला आणि कॉकरोज जनता पार्टीला (CJP) घाबरली आहे. जर या पक्षाला सिव्हिक सेन्स आला, तर मी त्याचा पहिला सदस्य असेन, असेही लक्ष्मण हाके म्हणाले.

Follow Us