काही तरी घडतंय… एकनाथ शिंदे दिल्लीला जाताच गुलाबराव पाटील तातडीने मुंबईला रवाना, जळगावचा महत्त्वाचा कार्यक्रम मध्येच सोडला
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील १७ विधान परिषदेच्या जागासाठी येत्या १८ जून रोजी मतदान होत आहे. महायुतीत या १७ जागांवरुन रस्सीखेच सुरु आहे. त्यात आज शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने मुंबईला प्रयान केले आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील १७ विधान परिषद जागासाठी निवडणूक होत आहे. १८ जून रोजी यासाठी मतदान होत आहे. या १७ जागांसाठी महायुतीत मोठी रस्सीखेच पाहायला मिळत असतानाच आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील त्यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्या उमेदवारीसाठी जळगावची जागा मिळवू इच्छीत आहेत. त्यामुळेच मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री दिल्लीसाठी निघाले असताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील कार्यक्रम अर्धवट सोडून मुंबईला निघाले आहेत.
कार्यक्रम अर्धवट सोडला
जळगावमधील शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. जळगावात गुर्जर समाजाचा कार्यक्रम सुरु असतानाच तो अर्ध्यावर सोडून मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या संदर्भात जळगावची विधानपरिषदेची जागा शिवसेनेला मिळावी यावर जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार आणि मंत्री ठाम आहेत. जळगावच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मंत्री गुलाबराव पाटील मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे.
जळगावच्या विधान परिषदेच्या जागेबाबत मंत्री गुलाबराव पाटल यांची एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप नेत्यांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे. जळगावच्या विधान परिषदेच्या जागेवर आपल्या चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्या उमेदवारीसाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी मागणी केली आहे. आजच भाजपचे नेते आणि महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्यात विधान परिषदेच्या जागेवरून चर्चा पार पडली आहे. उद्या आणि परवा बैठका होत आहेत.तसेच समन्वय समितीची महाराष्ट्र राज्याची बैठक असल्याने त्याचे निमंत्रण असल्याने त्यासाठी आपण मुंबई जात असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. सोमवारपासून विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
.