
छत्रपती संभाजीनगर येथे आज मच्छीमार संघटनेने आक्रमक भूमिका घेत विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन केले. आपल्या पारंपरिक जाळ्यांसह मत्स्यव्यवसायिक मोठ्या संख्येने आयुक्तालयावर धडकले आणि जोरदार घोषणाबाजी केली. मच्छिमार संस्थेकडे पूर्वीप्रमाणेच तलाव कायमस्वरूपी ठेवावेत, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी, तसेच १ जानेवारी रोजी काढण्यात आलेले परिपत्रक रद्द झाले पाहिजे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत परिपत्रक काढले होते, तलाव ठेका देण्याचे धोरण अबाधित असताना, मच्छिमार संघटनेकडे असलेले तलाव रद्द करण्यात आले होते, ते अबाधित राहिले पाहिजे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहोत. अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास पारदर्शक होणं महत्त्वाचं आहे. मंत्री राममो नायडू यांना पदावर ठेवणं योग्य नाही. सीबीआयला तपास करण्यासाठी वेळमर्यादा द्यावी लागेल. महिनाभरात सीआयडीने काय केलंय? त्यांनी सीसीटीव्ही ताब्यात घेतला का, असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.
अद्याप आमची शरद पवारांसोबत चर्चा झालेली नाही. पवार साहेब मुंबईत आल्यानंतर सुप्रिया सुळे त्यांच्याशी बोलतील. माझ्याकडे ब्लॅकबॉक्सचा फोटो आहे आणि तो किती जळाला आहे हे माहीत आहे. रिपोर्टमध्ये डिटेल्स असावेत, आम्हाला उगाच थातूरमातूर रिपोर्ट नको आहे. आमच्याकडे पुरावे आहेत, पण आम्हाला राजकारण करायचं नाही, असं रोहित पवार म्हणाले.
147 रस्ते सुधार योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील वृक्षारोपण वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र जन अभियान 2025 पासून सुरू करण्यात आलं आहे. या अभियानाअंतर्गत राज्यात 10 कोटी वृक्षारोपण करण्याचा मानस आहे. आतापर्यंत 9 कोटी 88 लाख वृक्षारोपण करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्यपालांनी दिली.
समृद्धी महामार्ग वाढवणपर्यंत नेणार आहोत. राज्याची 13 टक्के भागिदारी जीडीपीमध्ये आहे. व्यापक डिजिटल परिवर्तन योजना लागू केली. पोलिसांच्या घरांसाठी सरकारची विशेष योजना आहे. कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी एआयचा वापर केला जाणार आहे, असं वक्तव्य राज्यपालांनी केलं आहे.
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, “महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीसाठी अग्रेसर आहे. गडचिरोलीतून स्टील हब विकसित करतोय. विकसित महाराष्ट्रासाठी व्यापक योजना आखल्या आहेत. विदर्भात स्टील कॉरिडॉर करणार आहोत. पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक वाढवण्यावर भर देत आहोत.”
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सरकार सीमावासियांचं हिट जपणार आहे. दावोसमधून 30 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे. दावोसमधील करारामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत, असं राज्यपाल भाषणात म्हणाले.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा एकदा गॅस टँकरचा अपघात झाला. अचानकपणे टँकरचा ब्रेक फेल झाला. यावेळी चालकाने प्रसंगावधान दाखवत टँकरची डोंगराला धडक दिली. त्यामुळे सुदैवाने टँकर पलटला नाही. अमृतांजन पुलाजवळ दहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर महामार्ग पोलीस आणि प्रशासनाने तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि पुढच्या काही वेळात क्रेनच्या साहाह्याने टँकर बाजूला घेण्यात आला. काही काळ वाहतूक ठप्प होती खरी, मात्र आडोशी बोगद्याजवळ झालेल्या अपघातातून यंत्रणांनी धडा घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे यावेळी वाहतूक कोंडी टळली.
राज्यपाल आचार्य देवव्रत विधीमंडळात दाखल झाले आहेत. राज्यपालांचं विधीमंडळात स्वागत करण्यात आलं आहे. थोड्याच वेळात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वसगळ्यांना विंस्वासात घेऊन अर्थसंकल्प सादर करतील ही अपेक्षा आहेच, छत्रपती संभाजी नगरमध्ये छत्रपती शिवरायांचा अपमान होतोय हे निधेधार्ह्य आहे, ही विेयवल्ली ठेचून काढा, यासाठी ठोस सरकारी कायदा व्हायला पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी त्यांच्या हाताचा निर्णय निश्चित घेतील
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या अपघात तपास चौकशीसाठी बारामतीकर एकवटले. बारामतीतील प्रशासकीय भवन समोर नागरिकांची मोठी गर्दी. प्रांत अधिकारी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या अपघाताची चौकशी होण्यासाठी देण्यात येणार निवेदन..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे राहुल नार्वेकरांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विधानभवनात दाखल झाल्या आहेत. आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली.
दिल्लीतीला महाराष्ट्र सदनला धमकीचा फोन आल्याने मोठी खळबळ उडाली. सध्या महाराष्ट्र सदनच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
शिवाजी महाराजाना जर नागराला बांधून उचलून नेण्याची भाषा कुणी करत असेल तर मी ते कदापि होऊ देणार नाही .घटनेच्या दिवशी माझ्यावर दगड टाकायच्या तयारीत होते . शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांच्या पुतळ्याला कुणालाही हात लावू देणार नाही. पुतळा 3 तारखेला कुणीतरी अद्न्यात व्यक्तीने बसवला होता, असे संजीवनी वाघ यांनी म्हटले.
परभणी तालुक्यातील सिग्नापूर पाटीवर रास्तारोकोला सुरुवात. महिला शेतकऱ्यांचा ही मोठा सहभाग. शक्तीपीठ महामार्गासाठी बळाचा वापर करून जमिनीची मोजणी केली जात असल्याने शेतकरी आक्रमक. शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देणार नसल्याचा पवित्रा
चिखला येथील काकड गावातील पुतळा वाद प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर पाऊल उचलत गावात चार दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे.. तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे… लोणार तालुका अंतर्गत येणाऱ्या चिखला काकड गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. .तसेच कोणत्याही प्रकारचे चिथावणीखोर भाषण, मोर्चे, आंदोलन किंवा जमाव जमवण्यास कडक बंदी घालण्यात आली आहे… महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.. गावातील परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे…
आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक झाला आहे. याचे पडसाद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटणार आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचे अ ब क ड उपवर्गीकरण लागू करावे, या मागणीसाठी धाराशिवमधून मातंग समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. आरक्षण उपवर्गीकरणाबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या आरक्षणासाठी आक्रमक पद्धतीने आंदोलन करणार असा इशारा लहुजी शक्ती सेनेने दिला आहे.
बदलापुरात अंडाशयाच्या तस्करीनंतर आता पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. अंडाशयाच्या रॅकेटमध्ये मुंबई ठाणे परिसरातील अनेक बड्या डॉक्टरांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांच्या तीन पथकाने ठाणे, वांगणी, विठ्ठलवाडी तसेच बदलापूरमध्ये छापे टाकत झाडाझडती सुरू केली आहे. या कारवाईत तब्बल 10 लाखाहून अधिक किंमतीचा औषध साठा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ठाण्यातील काही आयव्हीएफ सेंटरवर पोलिसांनी छापे टाकल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील राणी गाव घाटात मजूरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन पलटी होऊन 50 फूट दरीत कोसळून चार आदिवासी नागरिकांचा मृत्यू झाला होता. आता याप्रकरणी अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहे. मेळघाट मधील खराब रस्ते आणि ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघात झाल्याचा आरोप अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी केला आहे. होळी सणाच्या निमित्ताने बाजार करण्यासाठी गेले होते. यावेळी जखमी प्रवाशांवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय व धारणीमध्ये उपचार सुरु आहेत. धारणी तालुक्यातील बेलतलाईवरून कंजूली या आपल्या गावी प्रवासी जात होते. यावेळी पिकअप वाहनात 15- 20 जण असल्याची माहिती समोर आली आहे. मेळघाटामध्ये दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे लोकांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागतो.
विरार पश्चिमेच्या नवापूर येथे एका तरुणाने दारुच्या नशेत विषारी सापाजवळ स्टंट करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साप पकडून गळयात घालून हा तरुण फिरत होता. विचित्र चाळे करत असताना सापाने त्याच्या हाताला दंश केला. त्यामुळे तेथील नागरिकांनी त्याला तातडीने जवळच्या खारोडी येथील महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. राजू चंदू बरड (४०) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी रेल्वेकडून सव्वा कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने जानेवारी २०२६ मध्ये सघन तिकीट तपासणी मोहीम राबवत २१ हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली. या मोहिमेत एकूण १ कोटी २५ लाख १७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, हा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत १५ टक्क्यांनी अधिक आहे. मोहिमेदरम्यान एका दिवसात ९०९ प्रकरणे नोंदवून सुमारे साडेपाच लाख रुपयांची वसुली करण्यात आली. प्रवाशांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या मोरम्मा मलकाजप्पा पट्टन शेट्टी (५८, रा. कर्नाटक) या महिला भाविकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. मोरम्मा या २७ जणांच्या समूहासोबत यात्रेसाठी आल्या होत्या. मंदिर परिसरात दर्शन घेऊन पार्किंगकडे परतत असताना त्यांना अचानक त्रास जाणवू लागला. त्यांना तात्काळ खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भिगवण प्रकरणातील पीडितेला न्याय मिळण्याच्या मागणी करता सकल हिंदू समाजाच्या वतीने बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आहे… या बंदला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय.. बारामती मधील मुख्य बाजारपेठ मधील सर्व दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी देखील या बंदला पाठिंबा दर्शवल्याचं पाहायला मिळत आहे.. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांचा देखील कडेकोढ बंदोबस्त देण्यात आलाय..
नाशिक जिल्हा परिषद साडेपाच हजार विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देणार. दुसरी ते पाचवीतील अध्ययनात मागे असलेल्या ५,६२५ विद्यार्थ्यांना पुढील ३० दिवसांत ‘निपुण’ करण्याचे लक्ष्य आहे. मार्च अखेरीस होणाऱ्या अंतिम चाचणीपूर्वी ही विशेष मोहीम ‘मिशन मोड’वर राबवली जाणार आहे. मिशन निपुण नाशिक’ मुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सालेकसा तालुक्यात सह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रब्बी हंगामातील धान पिकाला पावसामुळे होणार फायदा, तर बागायतदार शेतीसह कडधान्य पिकाला फटका बसण्याची शक्यता शक्यता आहे. विजांच्या कडकडाटसह काही भागात हलक्या तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे.
धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांने काढून टाकलेल्या ज्वारीचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. शेतात काढून ठेवलेल्या ज्वारीवर पावसाचे पाणी साचल्याने ज्वारी काळी पडण्याची शक्यता आहे. तसेच हरभरा,द्राक्ष,आंबा, गहू या रब्बी हंगामातील पिकांनाही फटका बसण्याची मोठी शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने ज्वारी पिकाचे नुकसान पाहायला मिळत आहे.
आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. आमदार अमित गोरखे आक्रमक पवित्र घेणार असून त्यांचे समर्थक मुंबईकडे रवाना झाले आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचं अ ब क ड नुसार वर्गीकरण करावे अशी मातंग समाजाची मागणी आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही याबाबत निर्णय झाल्याने समाजात नाराजी असून अधिवेशनात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. धाराशिव मधूनही मोठ्या प्रमाणात समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत.
परळी काल झालेल्या अवकाळी पावसामुळे परळी तालुक्यातील मांडेखेल शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. काल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या जवारी पिकावर परिणाम झाला असून संपूर्ण पीक आडवे पडले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ते मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.
दोन गटात झालेल्या वाद प्रकरणी चिखलात काकड येथील आरोपी सरपंच गणेश काकड यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. वाशीम मधून गणेश काकड यांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहीत समोर येत आहे. आतापर्यंत 23 लोकांना अचक करण्यात आली आहे. चिखला काकड गावाच्या परिसरात कलम 163 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. समाज माध्यमांवरील अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन.. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केलं आहे.
वाढती बेरोजगारी, तरुणाईला ड्रग्जचा विळखा, मंत्रालयासह राज्यात वाढलेली लाचखोरी, मुलुंडमधील मेट्रोचा अपघात, शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी, नरहरी झिरवळ्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि इतक देखील अन्य विषयांवर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार आहे.
आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 मार्च 2026 रोजी राज्याचं अर्थसंकल्प सादर करणार आहे. 30 दिवसांच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशन कोणते कोणते मुद्दे मांडले जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांचं अकस्मिक निधन, विमान अपघात, पार्थ पवार यांना मुंढला जमीन प्रकरणात दिलेली क्लीन चिट अशा अनेक प्रकरणांवर आजपासून होणाऱ्या अधिवेशनात सरकारला जाब विचारण्यात येणार असल्याचा इशारा पूर्वीच महाविकास आघाडीने दिला आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अधिवेशनात 15 विधेयके मांडली जाणार आहेत अशी माहिती दिली… शिवाय अधिवेशनात कोणते कोणते मुद्दे गाजणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर या ब्लॉगमध्ये राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं गाजणार याबद्दल प्रत्येक अपडेट जाणून घ्या…