Maharashtra Cabinet : रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गसाठी आदिती तटकरे यांच्या 3 प्रमुख मागण्या, मंत्रिमंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद

| Updated on: Jul 28, 2021 | 7:38 PM

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महत्वाची मागणी केली होती. त्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफचा बेस कॅम्प, तसंच तळीये गावाच्या पुनर्वसनाच्या मागणीचा समावेश होता.

Maharashtra Cabinet : रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गसाठी आदिती तटकरे यांच्या 3 प्रमुख मागण्या, मंत्रिमंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद
ADITI TATKARE
Follow us on

मुंबई : मुसळधार पाऊस, महापूर आणि दरड कोसळून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात मोठ्या आर्थिक नुकसानासह अनेक जीवही गेले. डोंगरकडा कोसळून महाड तालुक्यातील तळीये मधलीवाडी हे गाव उद्ध्वस्त झालं. ढिगाऱ्याखाली दबून 80 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यात काही चिमुकल्यांचाही समावेश होता. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महत्वाची मागणी केली होती. त्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफचा बेस कॅम्प, तसंच तळीये गावाच्या पुनर्वसनाच्या मागणीचा समावेश होता. (Decision to set up NDRF, SDRF base camps for Ratnagiri, Sindhudurg and Raigad districts)

एनडीआरएफचा बेस कॅम्प

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने महापूर, चक्रीवादळ आणि दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडत असतात. यावर्षी झालेल्या दुर्घटनेत कधीही न भरुन येणारं नुकसान झालं आहे. या आपत्तीपासून वाचण्यासाठी किंवा अशा आपत्ती घडल्यावर तातडीने मदतकार्य मिळण्यासाठी एनडीआरएफचा बेस कॅम्प रायगड जिल्ह्यात उभारण्यात यावा अशी मागणी आदिती तटकरे यांनी केली होती. एनडीआरएफ ही केंद्राच्या अखत्यारित येत असल्यामुळे त्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलीय.

एसडीआरएफचा बेस कॅम्प

एनडीआरएफचा बेस कॅम्प मिळण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या एसडीआरएफचा बेस कॅम्प तरी रायगड जिल्ह्यात देण्यात यावा अशी मागणीही तटकरे यांनी केली होती. त्याबाबत राज्य सरकारने महाडमध्ये हा बेस कॅम्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महाडमध्ये एक कायमस्वरुपी जागा उपलब्ध करुन देत एसडीआरएफचा बेस कॅम्प उभारण्यात येणार असल्याचं तटकरे म्हणाल्या. त्यामुळे आपत्तीच्या काळात मदतकार्य वेळेत पोहोचवणं सोपं जाणार आहे.

तळीये गावाचं पुनर्वसन

डोंगरकडा कोसळून महाड तालुक्यातील तळीये मधलीवाडी हे गाव उद्ध्वस्त झालं आहे. या गावात मातीच्या ढिगाऱ्याखालून 53 मृतदेह काढण्यात यश आलं. मात्र, 32 जण अद्यापही गायब आहेत. अशावेळी हे बचावकार्य 5 दिवसानंतर थांबवण्यात आलं आहे. आता तळीये गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत आश्वासन दिलं आहे. दरम्यान, तळीयेतील नागरिकांनी आम्हाला सध्या असलेल्या गावाच्या जवळच पुनर्वसित करण्यात यावं अशी मागणी केली आहे. पुनर्वसनाबाबत बाधितांवर जबरदस्ती न करता त्यांच्या विनंतीप्रमाणेच पुनर्वसन केलं पाहिजे. त्यामुळे जिथे तळीये गाव होतं त्या गावाच्या जवळच पुनर्वसन केलं जाईल, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्क्यांची कपात

BREAKING : जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात, अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडली

Decision to set up NDRF, SDRF base camps for Ratnagiri, Sindhudurg and Raigad districts