
राज्यात सध्या परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. अनेक जिल्ह्यात काढणीला आलेली पिकं पाण्याखाली गेली आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. आता या नैसर्गिक आपत्तीबद्दल आणि राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. देवा भाऊंच्या जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये उधळलात, तेच कोट्यवधी रुपये तुम्ही शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून दिले असते, तर काय बिघडलं असतं? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
धाराशिवमधील विविध पक्षाती कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे उपस्थित होते. ठाकरे गटाचे सर्वसर्वा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाताला शिवबंधन बांधत पक्षप्रवेश झाल्याचे जाहीर केले. या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल आणि पंचनाम्याबद्दल भाष्य केले.
अतिवृष्टी होतेय, ढगफुटी होतेय. पंचनामे करणार आणि त्यानंतर मोजके पैसे वाटून मोकळे होणार. शेतकऱ्यांचे नुकसान होतंय हे दिसतंय तरीही तुम्ही पंचनामे झाल्यानंतर त्यांना पैसे देणार. या सरकारने पंचनामे करुन नुकसान भरपाई ही द्यायला हवी. पण त्यासोबतच तातडीने सरसकट एक काहीतरी रक्कम द्यायला काय हरकत होती, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
देवा भाऊ या नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करताय, त्याचे पैसे आले कुठून हा पंचनामा कोण करणार? पैसे दिले कोणी? त्याची जाहिरात कशासाठी केली? छत्रपती शिवरायांच्या चरणी फुलं वाहताना किंवा हार घालताना जाहिरात करायची, ती करोडो रुपयांची जाहिरात होती. सर्व वृत्तपत्रात जाहिराती होत्या. हे करोडो रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी उधळत असाल, ते करोडो रुपये तुम्ही शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून दिली असतील, तर काय बिघडलं असतं? असा खोचक सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
तुमच्याकडे पैसे आहेत. पण कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी करता हे जे मी म्हणतो ते याबद्दल असते. त्या जाहिरातीची गरज काय होती. त्याऐवजी सरकारने तातडीने मदत करायला हवी होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.