सरकारकडून अचानक या पदांसाठीची भरती रद्द, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा झटका
सरकारी नोकर भरतीसाठी विद्यार्थी प्रचंड तयारी करतात. चार-चार वर्ष मेहनत घेतात. सरकारी नोकरी मिळवणं हे त्यांचं स्वप्न असतं. पण अचानक काही वर्ष तयारी केल्यानतंर ती भरती रद्द केली तर?

सरकारी नोकर भरतीसाठी विद्यार्थी प्रचंड तयारी करतात. चार-चार वर्ष मेहनत घेतात. सरकारी नोकरी मिळवणं हे त्यांचं स्वप्न असतं. पण अचानक काही वर्ष तयारी केल्यानतंर ती भरती रद्द केली तर? काय अवस्था होईल. असाच एक निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदाच्या भरती रद्दच्या शासनाच्या निर्णयाचा जळगावातील विद्यार्थ्यांकडून विरोध करण्यात आला. शासनाने निर्णय रद्द करावा या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून विद्यार्थ्यांनी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे व आमदार सुरेश भोळे यांची भेट घेतली. पाच ते सहा वर्षांपासून क्लासेस लावून स्टेनोग्राफरचे प्रशिक्षण घेतले. आता भरती होईल ही अपेक्षा असताना ऐनवेळी शासनाने भरती न करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांची नाराजी.
शासनाच्या भरती रद्दच्या राज्याच्या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्याबरोबरच राज्यभरातील हजारो ,लाखो स्टेनोग्राफरचे प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांचे भविष्य अंधारात. शासनाने स्टेनोग्राफरच्या भरती रद्दबाबतचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा पुढच्या काळात रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. शासनाच्या निर्णयाविरोधात जळगाव जिल्ह्यातील सर्व स्टेनोग्राफरचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, उमेदवार एकवटले असून निर्णय रद्द करण्याची मागणी केली जाते आहे.
स्टेनोग्राफर पदासाठी शेवटची भरती कधी?
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात स्टेनोग्राफरची पदं रिक्त आहेत, ती तात्काळ भरण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. 2018 आणि 2022 साली स्टेनोग्राफर पदांसाठी जाहीरात आली होती. त्यानंतर स्टेनोग्राफरची पद भरली गेलेली नाहीत. आता शासनाने स्टेनोग्राफर पद भरती रद्द केली आहे. हा मागच्या चार वर्षांपासून या पदांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा झटका आहे.
विद्यार्थ्यांनी काय खंत बोलून दाखवली?
ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्टेनोग्राफर पदासाठी तयारी करतात. आता ही भरती शासनाने रद्द केली, तर जायचं कुठे? कारण गेली चार-पाच वर्ष आम्ही यासाठी तयारी करत होतो. आता लगेच दुसरी फिल्डही चेंज करता येत नाही अशी खंत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.