शिंदे-फडणवीस सरकार खरंच कोसळणार? महाराष्ट्रातील बड्या नेत्याची भविष्यवाणी, पडद्यामागे काय-काय घडतंय?

| Updated on: Jan 01, 2023 | 5:15 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल? याचा भरोसा नाही. कारण पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत.

शिंदे-फडणवीस सरकार खरंच कोसळणार? महाराष्ट्रातील बड्या नेत्याची भविष्यवाणी, पडद्यामागे काय-काय घडतंय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

रवी गोरे, जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल? याचा भरोसा नाही. कारण पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात सत्तांतर होऊन सहा महिने झाले तरी मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्याप पार पडलेला नाही. आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी शिंदे गटातील काही आमदारांनी मुंबईत येऊन फिल्डिंग लावल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. पण सत्तांतर होऊन आता सहा महिने झालेत. आता फक्त दोन वर्षांची सत्ता शिंदे-फडणवीस सरकारच्या हाती राहिलेली आहे. असं असताना विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप करत घेरण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यांमध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार जास्तच अडकले. शेवटी त्यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपल्याला अडकवणारे आणि बदनाम करणारे आपल्याच पक्षातील आमदार असल्याचं विधान करुन टाकलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या सगळ्या घडामोडींनंतर आता महाराष्ट्रातील बडे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मोठं विधान केलंय.

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार कधीही कोसळू शकतं, असं विधान एकनाथ खडसे यांनी आज केलंय. “या सरकारमधल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. प्रत्येकाला मंत्री व्हायचं आहे. आणि प्रत्येकाने मंत्रिपदाचं गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवलेलं आहे”, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

“एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. अब्दुल सत्तार यांनी देखील उघडपणे याविषयी सांगितलं आहे. त्यामुळे अब्दुल सत्तारांनी ते कार्यकर्ते कोण आहेत? हे उघडपणे सांगावे. अब्दुल सत्तारांनी षडयंत्र रचणाऱ्याचं नाव उघडपणे सांगावं”, असं आवाहन एकनाथ खडसे यांनी केलंय.

“यांच्यावरती अजूनही न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार आहे. निकाल काय येतो यावर या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. अशाच प्रकारची जर अस्वस्थता वाढली तर हे सरकार कधीही कोसळू शकतं”, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.

अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले होते?

“माझ्यावरील आरोपांनंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे माझी बाजू मांडली आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझ्या पक्षातीलही काही लोक असू शकतात. मंत्रिपद न मिळालेल्या नेत्याचं माझ्याविरोधात षडयंत्र आहे. विरोधी पक्षात देखील माझे अनेक हितचिंतक आहेत. आमच्या पक्षाच्या बैठकीतल्या काही बातम्या बाहेर येत आहे. काही दिवसांआधीच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत काय झालं ते बाहेर आलं. याबाबत मी मुख्यमंत्री शिंदेंच्या कानावर घातलं असून मी चौकशीची मागणी केलीय”, असं अब्दुल सत्तार म्हणाले होते.