मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांना मोठा झटका, शिवसेना ठाकरे गटाला खिंडार, नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी सोडला पक्ष
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आणखी एका नेत्याने आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. मात्र त्यानंतर हे यश त्यांना टिकवून ठेवता आलं नाही, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभवाचा धक्का बसला, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं. या निवडणुकीच्या निकालापासून महाविकास आघाडीला मोठी गळती लागली आहे, याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना शिंद गट आणि भाजपमध्ये प्रवेश केल्याचं पहायला मिळालं. दरम्यान आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे विभाग समन्वयक बिपीन गेहलोत यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे, त्यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला आहे. या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गटाला ठाण्यात मोठं खिंडार पडलं आहे. तसेच आता महाविकास आघाडीमध्येच फोडा-फोडीचं राजकारण सुरू झाल्याचं दिसून येत आहे.
जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
दरम्यान यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, बिपीन गेहलोत यांचा आज पक्ष प्रवेश झाला आहे. आज स्वातंत्र्य दिन आहे, आजच्या दिवशी भारत स्वातंत्र झाला. मात्र गेल्या काही दिवसात ज्या घटना घडल्या त्यामुळे मन दुखावलं गेलंय. सरन्यायाधीश भूषण गवई यांना एका व्यक्तीने चप्पल मारली कारण ते दलित आहेत. खरगे यांच्या भाषणानंतर ती जागा गंगाजल टाकून पवित्र करण्यात आली, कारण ते दलित आहेत आणि आपण म्हणतो भारत स्वातंत्र्य झाला आहे. आपल्याला गांधी आणि नेहरूंनी स्वातंत्र्य दिलं, बाबासाहेबांनी संविधान देऊन समानता दिली, पण संविधान मिटवणारे आता पैदा झाले आहेत. जातीयवाद्यांची मानसिकता कधीच बदलू शकत नाही, ही लढाई या मानसिकतेच्या विरोधात आहे, ही लढाई मनुवादाच्या विरोधात आहे, मरू पण मनुवाद्यांचा विरोध करत राहू, असं यावेळी आव्हाड यांनी म्हटलं आहे.
