Monsoon Update : सांगावा आला… अजून 5 दिवस यायचा नाय, मुंबईकरांचा घामटा निघणार; मान्सूनची डिटेल अपडेट घ्या जाणून

महाराष्ट्रात मान्सून अजूनही दूर आहे, मुंबईसह अनेक ठिकाणी उष्णतेचा आणि दमट हवेचा त्रास वाढला आहे. हवामान खात्यानुसार, पुढील 5 दिवस पावसाची शक्यता कमी असून, मान्सून सक्रिय होण्यास अजून वेळ लागेल. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, कारण पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. एल निनोमुळे मान्सूनचा वेग मंदावला आहे.

Monsoon Update : सांगावा आला... अजून 5 दिवस यायचा नाय, मुंबईकरांचा घामटा निघणार; मान्सूनची डिटेल अपडेट घ्या जाणून
मान्सूनबद्दल मोठी अपडेट
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jun 13, 2026 | 3:24 PM

आज येईल, उद्या येईल म्हणून ज्या मान्सूनची वाट पाहिली जात आहे, तो अजून यायचा पत्ता नाहीये. जूनचा अर्धा महिना उलटत आला तरी मान्सूनचं आगमन झालेलं नाही. राज्यातील काही भागात एक दोन सरी कोसळल्या. हा अपवाद वगळता संपूर्ण राज्यात पावसाच्या नावाने ठणठणाट आहे. त्यातच उकाडा वाढल्याने राज्यातील नागरिकांना नकोसं झालं आहे. घामाच्या धारा निघत असून अनेकांना उष्माघाताचाही त्रास होताना दिसत आहे. मुंबईतही येत्या काळात प्रचंड उकाडा वाढण्याचे संकेत मिळत आहेत. राज्यात अजून पाच दिवस तरी पाऊस येणार नसल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला अजून पाच दिवस कळ सोसावी लागणार आहे.

मुंबईतील हवामानात सध्या मोठे बदल पाहायला मिळत आहेत. दमट उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यभर मान्सून सक्रिय होण्यासाठी आणखी 5 दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याची नवी माहिती समोर येत आहे.

चिंता वाढली

गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्रातील मान्सूनची प्रगती थांबलेली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशाच्या उत्तरेकडील काही भागांत मान्सूनने पुढील वाटचाल केली असली तरी महाराष्ट्रात त्याची गती मंदावली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.

12 दिवसात 2.37 टक्के पाऊस

दरम्यान, एल निनो सक्रिय झाला असून त्याचा परिणाम म्हणून मान्सूनला ब्रेक लागला आहे. पुढचे काही दिवस पावसाची ओढ राहणार आहे. पुढील आठवडाभर पावसाची शक्यता कमीच असल्याचं सांगितलं जात आहे. अरबी समुद्रातील नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा वेग कमी झाला आहे. अरबी समुद्रातील कमकुवत वारे आणि जागतिक हवामान बदलाने मान्सूनची वाटचाल मंदावली आहे. कोकणातल्या अनेक भागात दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. पण पावसाची ओढ पाहता बळीराज्याने पेरणीची घाई टाळावी असं आवाहन केलं जात आहे. जून महिन्यातल्या 12 दिवसात कोकणात केवळ 2.37 टक्केच पाऊस झाला आहे.

पेरण्या लांबणीवर जाणार

तर, 1 जूनपासून पावसाळा सुरू झाला आहे. पण पाऊसच बेपत्ता झाला आहे. मृग देखील कोरडाच गेला आहे. अमरावती जिल्ह्यात 12 दिवसात 82 टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा वळल्या आहेत. राज्यात 20 जून नंतरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता काहींकडून वर्तवली जात आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबणीवर जाणार असून पेरण्या लांबणीवर गेल्यास उत्पादनावर होणार परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

तोपर्यंत पेरणी नकोच

पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत, असा सल्ला धुळे जिल्हा कृषी विभागाचे कृषी अधीक्षक सुरज जगताप यांनी दिला आहे. यंदा एल निनो चा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असून एल निनोमुळे पाऊस लांबला आहे. धुळे जिल्ह्यासह खानदेशात सरासरी सात जून पासून पेरण्यांना सुरुवात होते. मात्र यंदा पाऊस लांबला असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीयुक्त पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत, असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे. सरासरी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात. दरम्यान ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन च्या माध्यमातून कापसाची लागवड करावी. असा सल्ला कृषी अधीक्षक जगताप यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us