पुढील 24 तास धोक्याचे, हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट, अख्ख्या महाराष्ट्राला झोडपणार
IMD Red Alert : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. आता पुढील 24 तासांमध्ये या भागात अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या भागात गेल्या काही 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे पूर्व विदर्भातील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकले असून त्याचा प्रभाव अद्याप कायम आहे. पुढील 24 तासही राज्यात अशीच पावसाची परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी
पुण्यातील हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी सांगितले की, राज्यात पुढील 24 तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथा भागासाठी पावसाचा रेड अलर्ट तर पुणे शहरासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांनंतर पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. खासकरून रविवारनंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच घाट परिसरात जाताना विशेष दक्षता घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन सानप यांनी केले आहे. तसेच राज्याच्या इतर भागातील नागरिकांनीही कामाशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, शाळांना सुट्टी जाहीर
धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून हवामान विभागाने आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले असून धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरासह ग्रामीण भागात अनेक सखल ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने आज जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून प्राथमिक व माध्यमिक शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, सततच्या पावसामुळे शिरपूर तालुक्यातील अनेर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणातून 4 हजार 921 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच अक्कलपाडा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नदी-नाल्यांमध्ये किंवा पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.