होळी करा लहान, पोळी करा दान, राज्यातल्या जनतेला कुणाचं आवाहन?

राज्यातील जनतेला होळीच्या पार्श्वभूमीवर विशेष आवाहन करण्यात आले आहे. तब्बल 30 वर्षापासून हा उपक्रम राबविला जात असून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळतो.

होळी करा लहान, पोळी करा दान, राज्यातल्या जनतेला कुणाचं आवाहन?
Image Credit source: Google
| Updated on: Mar 04, 2023 | 5:40 PM

नाशिक : दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही होळी सणाच्या ( Holi Festival ) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ( Maharashtra Superstition Eradication Committee  ) वतीने आवाहन करण्यात आले आहे. मानवी समाजातील एकोपा वाढावा, तणावमुक्ती व्हावी व सर्वांना आनंद मिळावा यासाठी सण-उत्सव, समारंभ साजरे करणे अतिशय महत्त्वाचे असते. मात्र हे सण-उत्सव, समारंभ साजरे करताना पर्यावरणाचे संतुलन अबाधित राहील, याचे भान ठेवणे, काळजी घेणेही अत्यंत आवश्यक आहे. होळी सण साजरा करत असतांना निसर्ग ओरबडला जातो. त्यामुळे पर्यावरणपूरक सण साजरा करावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हंटलय, अलीकडच्या काळात जवळपास सर्वच धर्मियांचे सण-उत्सव हे निसर्गाला ओरबाडूनच साजरे केले जात असल्याचे चित्र गडद होताना दिसते. त्यामुळे निसर्गचक्र विस्कळीत होऊन एकूणच जीवसृष्टीला धोका निर्माण होत असल्याचे अनेक स्पष्ट संकेत मधून मधून अनुभवायला मिळतात.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा धोका वेळीच ओळखून, मागील तीस वर्षांपासून महाराष्ट्रात सर्वच सण – उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे करण्यासाठी कृतिशील प्रबोधनाचे काम हाती घेतलेले आहे.

विशेषतः शाळा महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांकडून फटाके मुक्त दिवाळी, पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याबद्दलचे संकल्प पत्र स्वेच्छेने भरून घेतले जातात. त्यामुळे पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असते.

आर्थिक बचत होण्यासोबतच अपघात टळतात. यावर्षीही महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने ‘होळी करा लहान, पोळी करा दान ‘ ह्या उपक्रमांतर्गत नाशिक शहरातून पुरणपोळी तसेच खाद्यपदार्थ होळीत न टाकता त्यांचे दान करावे, असे नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे.

होळीच्या ठिकाणी संकलित झालेल्या पुरणपोळ्यांचे गरजू आणि गरीब कुटुंबा, अनाथाश्रम, वृद्धाश्रमामध्ये वाटप करून त्यांच्या पोटातील भुकेची आग शमविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

माणसातील दुर्गुणांची होळी करावी, असा नितीयुक्त संदेश देणारा होळीचा सण मात्र आजही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकूड, गोवऱ्या जाळून चढाओढीने साजरा केला जातो.

प्रत्यक्ष होळी पेटली असताना , होळीत नारळ, खोबरे व पुरणपोळी असे खाद्यपदार्थ टाकून जाळले जातात. होळी जवळच अर्वाच्य शब्दात बोंबा मारल्या जातात. होळी नंतर येणारा रंगपंचमी हा सणही प्रचंड पाण्याची नासाडी करणारा आहे.

रासायनिक रंगाने रंगपंचमी खेळली जाते. त्यामुळे पाण्याचा अनाठाई अपव्यय तर होतोच, शिवाय रासायनिक रंगामुळे त्वचेला आणि डोळ्याला गंभीर इजा होण्याचा मोठा धोकाही असतो. म्हणून एका गावात, कॉलनीत गल्लीत एकच लहान, प्रतिकात्मक होळी करावी.

होळीसाठी लाकूड, गोवऱ्या जाळू नयेत, पुरणपोळी, नारळ, खोबरे असे खाद्यपदार्थ होळीत टाकण्याऐवजी त्यांचे गरजू व गरीब कुटुंबांमध्ये मध्ये वाटप करावे. कुणाबाबतही अर्वाच्य शब्द उच्चारू नये असं आवाहन करण्यात आले आहे.