Weather Update: राज्यातील ‘या’ भागांत अवकाळी पावसाचा अंदाज; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील हवामान

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान सतत बदलताना दिसत आहे. आता पुढील पाच दिवसांत काही भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यातील हवामान कसं असेल, ते जाणून घ्या..

Weather Update: राज्यातील या भागांत अवकाळी पावसाचा अंदाज; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील हवामान
Rain Update
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 19, 2025 | 10:34 AM

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होत आहे. गेले काही दिवस राज्यात उष्णतेची लाट आली होती. त्यानंतर आता काही भागांत आता थेट पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. धुळे, नंदूरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमधील काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसंच चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावेळी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण, गोवा याठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील आठवड्यात उकाडा वाढणार असल्याचं म्हटलं गेलंय.

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढील काही दिवस कोरड्या वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कालावधीत किमान तापमानाचा पारा 24 ते 26 अंशापर्यंत जाऊ शकतो. तर कमाल तापमानाचा पारा 34 ते 36 अंशापर्यंत असेल. या कालावधीत आकाश निरभ्र असू शकेल. त्यामुळे कोरडे वारे आणि उन्हाच्या झळा यांचा ताप होऊ शकतो.

पुढील पाच दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका पाऊस आणि गडगडाटी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही ठिकाणी विजांसह वादळ आणि 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात दिवसाचं तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने कमी होण्याची अपेक्षा आहे.

मध्य महाराष्ट्रात खानदेशपासून कोल्हापूर आणि सोलापूरपर्यंत 10 जिल्ह्यांमध्ये 18 मार्च ते 20 मार्चदरम्यान ढगाळ हवामान असेल. त्याचसोबत याठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात 18 ते 21 मार्चदरम्यान आठ जिल्ह्यांवर परिणाम होऊ शकतो. तर विदर्भातही 21 आणि 22 मार्च रोजी अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये वातावरण उष्ण राहण्याची शक्यता आहे.

Follow Us