
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू होऊन 7 महिने उलटून गेले असून आता या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. मात्र त्याची धास्ती अनेक महिलांच्या मानत असून अवघ्या महिन्याभरात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये 5 लाखांनी घट झाली आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता महायुतीच्या एक नेत्याने यावर स्पष्ट भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झाली शिवसेना शिंदे गटाचे नेत, मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितलं. या योजनेत काही नियम आहेत. ज्यांच वय 65 पेक्षा जास्त असेल, ती चालणार नाही , किंवा ज्यांच्याकडे चारचाकी असेल ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही. तसेच अनायवधानाने किंवा नजरचुकीने अशा महिला या योजनेत आल्या असतील तर त्या कमी झाल्या आहेत. जाणीवपूर्वी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही. ती आहे तशीच चालू राहणार आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
तसेच चारचाकीचा निकष, अडीच लाख इन्कम दाखवून कोणी इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर त्याही महिला योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरतात, हे सर्व निकष आहेत. या सगळ्या नियमांत न बसल्यामुळे काही महिला कमी झाल्या असतील, पण सरसकट कुठेही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही किंवा त्यातले लाभार्थी कमी होणार नाहीत, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.
न्यायिक व्यवस्थेवर कायमस्वरूपी आक्षेप घेणं ही काही लोकांची फॅशन – आव्हाडांना टोला
बदलापूरमधील शाळेतील चिमुरड्या मुलींवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पाच पोलिसांना दोषी ठरवलं होतं. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. मात्र आम्हाला हा खटला लढायचा नाही असे अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी सांगितल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला. मात्र त्याच्या या मागणीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले. ही केस मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याची शंका आव्हाड यांनी व्यक्त केली. त्याबद्दलही सामंत यांना प्रश्न विचारण्यात आला.
एखादी बाब न्यायालयात चालू असताना, त्यावर वकीलांकडून बाजू मांडण्यात येत असताना, त्याच्यावर बाहेर भाष्य अथवा ट्विट करणं योग्य नाही. न्यायिक व्यवस्थेवर कायमस्वरूपी आक्षेप घ्यायचा, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर आक्षेप घ्यायचा, ही काही लोकांची फॅशन बनली आहे , मला त्याच्यावर जास्त बोलायचं नाहीये, असं म्हणत सामत यांनी आव्हाडांना टोला लगावला.