पालघर जिल्ह्याला लागलेला कुपोषणाचा विळखा कायम, दोन महिन्यात 40 बालक, 5 मातांचा मृत्यू, प्रशासन साखर झोपेतच!

| Updated on: Jul 01, 2021 | 4:28 PM

जिल्ह्यात आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या एप्रिल आणि मे या 2 महिन्यातच 40 बालमृत्यू आणि 5 मातांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. असं असलं तरी पालघर जिल्हा प्रशासन अद्याप साखर झोपेतच असल्याचं पाहायला मिळत आहे.

पालघर जिल्ह्याला लागलेला कुपोषणाचा विळखा कायम, दोन महिन्यात 40 बालक, 5 मातांचा मृत्यू, प्रशासन साखर झोपेतच!
पालघर कुपोषण प्रतिकात्मक फोटो
Follow us on

मोहम्मद हुसेन खान, पालघर : जिल्ह्याला लागलेला कुपोषण आणि बालमृत्यूचा विळखा अजूनही कायम आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यातच 40 बालमृत्यू, तर 5 मातांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना काळात ग्रामीण भागातील अंगणवाडी, ग्राम बालविकास केंद्र आणि पालघर जिल्ह्यातील डगमगलेली आरोग्यव्यवस्था याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालं. त्यामुळे कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्युदरात वाढ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्ह्यात आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या एप्रिल आणि मे या 2 महिन्यातच 40 बालमृत्यू आणि 5 मातांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. असं असलं तरी पालघर जिल्हा प्रशासन अद्याप साखर झोपेतच असल्याचं पाहायला मिळत आहे. (Malnutrition in Palghar district, 40 children, 5 mothers die in two months)

पालघर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 296 बालमृत्यू तर 12 मातांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मात्र यावर्षी सुरुवातीलाच ही आकडेवारी वाढल्याने पालघर जिल्हा पुन्हा कुपोषण, बालमृत्यू आणि माता मृत्यू अशा विळख्यात सापडलेला पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्यात 146 अतितीव्र कुपोषित तर 1609 कुपोषित बालके आढळून आली आहेत . तर मे महिन्यात यामध्ये वाढ झाल्याच दिसून येत असून 139 अतितीव्र, 1 हजार 679 तीव्र कुपोषित बालके आढळून आली आहेत.

प्रशासनाकडून स्वत:चीच पाठ थोपटण्याचा प्रयत्न

दरम्यान, मागील वर्षी या 2 महिन्यात बालमृत्यू आणि मातामृत्यूचं प्रमाण अधिक होत. त्यामुळे यावर्षी ही आकडेवारी कमी झाली आहे. तसंच या बालमृत्यू आणि माता मृत्यूचं कारण फक्त कुपोषण नाही तर अन्यही असल्याचं सांगत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी आपली आणि जिल्हा परिषदेची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र जिल्हा प्रशासन आणि पालघर जिल्ह्यात कधीतरीच फिरकणारे पालकमंत्री दादा भुसे यांच्या अकार्यक्षमतेमुळे कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यूचं प्रमाण अजूनही कायम असल्याचंच पाहायला मिळत आहे.

अमरावती जिल्ह्यातील चिमुकली ठणठणीत

अमरावती जिल्ह्यातील देवरा या गावातील चिमुकल्या भाग्यश्रीची प्रकृती जन्मत: कमी वजन आणि मेंदूमध्ये झालेले इन्फेक्शन यामुळे बिघडली होती. हे कळताच महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी तातडीने तिला उपचार मिळवून दिला. तसेच याबाबत यंत्रणेला निर्देश देताना बालिकेवर चांगल्या रुग्णालयात उपचार होण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत अंगणवाडी सेविका व नागरिकांनी लोकवर्गणी गोळा करून चिमुकलीला उपचार मिळवून दिले. आता या बालिकेच्या प्रकृतीत चांगली सुधारणा आहे. पालकमंत्र्यांनी 26 जून रोजी तिची भेट घेऊन विचारपूस केली व आर्थिक मदतही केलीय.

संबंधित बातम्या :

पालघर जिल्ह्यात कुपोषित बालकांमध्ये मोठी वाढ, चिंता वाढली

पालघरच्या आदिवासी भागातही आधुनिक शेती, 86 ठिकाणी 26 हजार स्ट्रॉबेरी झाडांची लागवड

Malnutrition in Palghar district, 40 children, 5 mothers die in two months