अखेर आज तो सुदिन अवतरला; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; राज्यातील नेते काय म्हणाले?

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एकीकडे घटस्थापनेचा शुभ दिवस असताना केंद्र सरकारने मराठी बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेलाही अभिजात भाषेला दर्जा दिलेला आहे.

अखेर आज तो सुदिन अवतरला; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; राज्यातील नेते काय म्हणाले?
devendra fadnavis
| Updated on: Oct 03, 2024 | 9:07 PM

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषिकांत आनंदाची प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विविध मान्यवरांनी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त म्हणाले की आजचा दिवस सुवर्ण दिवस म्हणून गणला जाणार आहे. आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस!

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो.हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला.नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मानले आभार

सुधीर मुनगंटीवार यावर प्रतिक्रीया देताना म्हणाले की आनंदाचा क्षण आहे. अभिमानाचा क्षण आहे. आपली मराठी जगभर पोहोचावी. आपली संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जगातील मराठी माणसापर्यंत पोहोचावी. ही मागणी ३५ वर्षापासूनची आहे. शरद पवार केंद्रात मंत्री होते, तेव्हापासूनची मागणी आहे. महाराष्ट्रासाठी हा आनंदाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाचा ३५० सोहळा आपण साजरा केला. आता मराठी भाषेला सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे आनंद आणि अभिमान आहे असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. आम्ही मोदींच्या अभिनंदनाचा ठराव करू. या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, साहित्यिक आहेत, त्यांची समिती तयार करून व्याकरण आणि शब्द भंडार वाढवण्याचा प्रयत्न करू असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us