Uday Samant : त्यांना माझ्या विमानात बसायचं असेल तर घेतो ना, एवढी जलसी कशाला हवी? उदय सामंत यांचं सडेतोड प्रत्युत्तर
Uday Samant : "ऑपरेशन टायगर हे काही सांगून होत नाही. सचिनभाऊ कसे पक्षात आले? कसे उपसभापती झाले तुम्हाला माहितीय. कोणालाच हे माहित नव्हतं. टायगर ऑपरेशन कधीच सांगून झालेलं नाही"

चाकणमधून काही उद्योग स्थलांतर करणार आहेत, त्यावरुन सरकारवर टीका होत आहे. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत बोलले आहेत. आदित्य ठाकरे चाकणच्या उद्योजकांना भेटणार होते. त्यावर उदय सामंत यांना विचारलं असता ते म्हणाले की,”कोण सक्रीय झाले, कोण घरामध्ये बसलय यावर मी बोलणार नाही. काही लोकांना चाकणच्या लोकांना जाऊन भेटावं असं वाटलं हे आपलं भाग्य आहे” चाकणचे उद्योग बंद होत असताना मंत्री खटाखट फिरतायत या अंबादास दानवेंच्या टीकेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. “त्यांना माझ्या विमानात बसायचं असेल तर घेतो ना, विमानात. एवढी जलसी कशाला हवी?. एवढी जलसी असू नये. अंबादास दानवे यांना माझ्या विमानात, हॅलिकॉप्टर किंवा माझ्या मांडीवर येऊन बसायचं असेल तर घेईन मी. राजकारणात एवढी जलसी करुन चालत नाही” असं उदय सामंत म्हणाले.
“जे तुम्हाला हवं ते कोणी दिलं नाही, ते एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यांना मिळालं की, टीका करत रहायची” “अंबादास दानवे माझे जवळचे मित्र आहेत. त्यांना खरोखरच माझ्या फिरण्याचा एवढा त्रास होत नसेल तर त्यांनी माझ्यासोबत विमानात, हेलिकॉप्टरमध्ये येऊन बसावं. तुम्ही काय करताय, हे देखील सांगावं” असं उदय सामंत म्हणाले. “काही लोकांना माझं फिरण याच जलसीमध्ये रुपांतर झालं आहे. हा एवढ कसं काय फिरतोय, जिल्ह्यात जातो याच्यामुळे अस्तित्व नष्ट होईल ही भिती आहे, जे माझ्यावर टीका करतायत त्यांनी 2029 मध्ये पुन्हा आपल्या मतदारसंघात निवडून यावं” असं आवाहन उदय सामंत यांनी दिलं.
हा काँग्रेसला धक्काच आहे ना
ऑपरेशन टायगर पुन्हा होणार का? यावरही उदय सामंत बोलले. “ऑपरेशन टायगर हे काही सांगून होत नाही. सचिनभाऊ कसे पक्षात आले? कसे उपसभापती झाले तुम्हाला माहितीय. कोणालाच हे माहित नव्हतं. टायगर ऑपरेशन कधीच सांगून झालेलं नाही. शिंदेसाहेब काय करु शकतात हे चारवर्षापूर्वी बघितलय. परवा खासदाराच्या, सचिन भाऊंच्या बाबतीत बघितलं आहे. असे पक्ष प्रवेश होत असतील तर हे रोज सुरु आहे. काल एक नगराध्यक्ष आणि 18 नगरेसवकांनी पक्ष प्रवेश केला. हा काँग्रेसला धक्काच आहे ना. एक नगराध्यक्ष 18 नगरसेवकांच शिवसेनेत येणं ही एकनाशिंदेंची किमयाच आहे” असं उदय सामंत म्हणाले.
भाजपला जसं वाटतं तसं आम्हाला वाटतं यात गैर काय
प्रतापराव जाधव बोलतात एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मनातले मुख्यमंत्री आहेत. त्यावर उदय सामंत म्हणाले की, “मी शिवसेनेत काम करतोय. एकनाथ शिंदे उच्च पदावर जावेत, मुख्यमंत्री व्हावेत ही आमच्या सर्वांची इच्छा आहे. फडणवीस भाजपचं नेतृत्व करतात, ते उच्च पदावर जावेत अशी भाजप नेते, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. भाजपला जसं वाटतं तसं आम्हाला वाटतं यात गैर काय”