Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

| Updated on: Feb 17, 2022 | 9:45 AM

गालिब यांनी आयुष्यात आलेले बरे-वाईट अनुभव आपल्या शेरमधून मांडले. त्यांनी एकूण 18000 शेर फारसीमध्ये लिहिले. मात्र, मित्रांनी आग्रह केल्यामुळं जवळपास 1200 शेर उर्दूत लिहिले. त्यांच्यावर मीर, आमीर खुसरोचा प्रभाव असल्याचं म्हटलं जातं.

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-ग़ालिब का पता...!
मिर्झा गालिब
Follow us on

नाशिकः जगावं कसं, हे तो सांगतो. आपला खरा मित्र कोणता आणि खरा शत्रू कोणता, हे तोच सांगतो. तोच जीवनाचं तत्वज्ञान अगदी सोप्या-सोप्या भाषेत उलगडतो. इतकंच नाही, तर प्रेयसीवर प्रेम कसं करावं, रुसलेल्या प्रियतमेला कसं मनवावं हे ही तोच सांगतो. कारण जगणं म्हणजे हे सगळं काही त्यात असतं. त्यामुळंच तो आपला कधी होऊन गेला, हे कोणालाही कळलं नाही. बसता-उठता अनेकांच्या ओठी त्याच्या ओळी असतात. त्यांचं नाव मिर्झा गालिब. 27 डिसेंबर 1797 त्यांचा जन्म आणि 15 फेब्रुवारी 1869 ला त्यांचा मृत्यू झाला. आज गालिब यांची पुण्यतिथी. मिर्झा गालिब (Mirza Ghalib) हे थोरल्या बाजीरावांची पत्‍नी मस्तानी (Mastani) यांच्या वंशात जन्माला आलेले. सुधारक वृत्तीचे, सर्वधर्मसमभाव मानणारे, नमाज पढणारे अन् रोजा ठेवणारे. गालिब यांनी अनेकांच जगणं समृद्ध केलंय. आपण त्यांना वाचलं, तर आपलंही होईल. गालिब यांच्यावर गीतकार गुलजारांची (Gulzar) एक नितांत सुंदर कविताय. त्या कवितेतून ते आपल्याला गालिबचा पत्ता सांगतात…

बल्ली-मारां के मोहल्ले की
वो पेचीदा दलीलों की सी गलियाँ
सामने टाल की नुक्कड़ पे बटेरों के क़सीदे
गुड़गुड़ाती हुई पान की पीकों में वो दाद वो वाह वा
चंद दरवाज़ों पे लटके हुए बोसीदा से कुछ टाट के पर्दे
एक बकरी के मिम्याने की आवाज़
और धुँदलाई हुई शाम के बे-नूर अँधेरे साए
ऐसे दीवारों से मुँह जोड़ के चलते हैं यहाँ
चूड़ी-वालान कै कटरे की बड़ी-बी जैसे
अपनी बुझती हुई आँखों से दरवाज़े टटोले
इसी बे-नूर अँधेरी सी गली-क़ासिम से
एक तरतीब चराग़ों की शुरूअ’ होती है
एक क़ुरआन-ए-सुख़न का सफ़हा खुलता है
असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता मिलता है

अन् गालिब पोरके झाले

गालिब यांचा जन्म आगरा येथे झाला. वडील लहानपणीच वारले. त्यामुळं त्यांना आजोबा, काकांनी वाढवलं. नंतर त्यांचे काकाही गेले. त्यामुळं काकांच्या पेन्शनवर त्यांची गुजराण व्हायची. ते ब्रिटीशांच्या ईस्ट इंडिया कंपनीत सैन्यात अधिकारी होते. त्यांचे आजोबा मध्य आशियातल्या समरकंद येथून 1750 मध्ये भारतात आलेले. त्यांचे आजोबा मिर्झा कोबान बेग खान अहमद शाहच्या काळात भारतात आलेले. त्यांनी दिल्ली, लाहोर, जयपूरमध्ये काम केलं. शेवटी आग्रा येथे स्थायिक झाले. त्यांना मिर्झा अब्दुल्ला बेग खान आणि मिर्झा नसरुल्ला बेग खान ही दोन मुलं होती. तीन मुलीही होत्या. गालिबचे वडील मिर्झा अब्दुल्ला बेग. त्यांनी लग्न केलं आणि सासरी रहायला सुरुवात केली. सुरुवात त्यांनी लखनऊचे नवाब आणि नंतर हैदराबादच्या निझामाकडं काम केलं. 1803 मध्ये अलवरच्या युद्धात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी गालिब फक्त 5 वर्षांचे होते.

11 व्या वर्षांपासून लिहिणं सुरू केलं…

गालिब यांनी नेमकं काय शिक्षण घेतलं, याची माहिती उपलब्ध नाही. मात्र, त्यांचे एक निकटवर्तीय इराणमधून आलेले. त्यांच्या सहवासात त्यांनी फारसी भाषा शिकली. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षांपासून त्यांनी गझल, लिहायला सुरुवात केली. त्यांनी फारसी आणि उर्दू या दोन्ही भाषेतून लिखाण सुरू केलं. गद्य, पद्य सर्व क्षेत्रात मुक्तसंचार केला. अवघ्या 13 व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. त्यांच्या पत्नी नवाब ईलाही बख्श यांची मुलगी उमराव बेगम. लग्नानंतर गालिब यांनी दिल्ली गाठली.

मीरचा प्रभाव…

गालिब यांनी आयुष्यात आलेले बरे-वाईट अनुभव आपल्या शेरमधून मांडले. त्यांनी एकूण 18000 शेर फारसीमध्ये लिहिले. मात्र, मित्रांनी आग्रह केल्यामुळं जवळपास 1200 शेर उर्दूत लिहिले. त्यांच्यावर मीर, आमीर खुसरोचा प्रभाव असल्याचं म्हटलं जातं. त्यांनी आयुष्यभर कोणतेही काम केलं नाही. ब्रिटीश सरकारनं काकाची मिळणारी पेन्शन बंद केलेली. त्यामुळं त्यांनी ही पेन्शन सुरू करावी यासाठी अनेकदा कर्ज काढून-काढून कोलकाता गाठलं. मात्र, त्यात त्यांना यश यायचं नाही.

राजकवीची टिंगल अन्

गालिब दिल्लीला आलेले तेव्हाची गोष्ट. राजकवी उस्ताद जौक दिल्लीतल्या रस्त्यावरून पालखीतून निघालेले. तेव्हा गालिब यांनी एक शेर पेश केला. या शेरमधून गालिब यांनी राजकवीचा अपमान केला, अशी अफवा जौक यांच्या बगलबच्चांनी उठवली. गालिब यांनी शेरमधून राजकवींवर शरसंधान साधले, असे म्हणण्यात आलं. याचं उट्ट काढण्यासाठी अनेकजण सरसावलेले. त्यांना तशी संधीही आयती साधून आली. दिल्लीमध्ये बादशहानं एक कविसंमेलन भरवलेलं. त्यात सहभागी होण्यासाठी गालिब गेलेले. राजकवी जौक यांच्या बगलबच्चांनी तिथं हा विषय उकरून काढलाच. अन् तिथून गालिबचं आयुष्यच पालटलं.

अन् गालिबचं नाव झालं…

दिल्लीतल्या कविसंमेलनात गालिब यांनी एका शेरमधून राजकवीचा अपमान केल्याचा विषय निघाला. ‘हुआ है शह का मुसाहिब फिरे है इतराता’ (राजाची चापलुसी करणारा दरबारी ऐटीत फिरतो), अशा शेरमधून गालिब यांनी राजकवींचा अपमान केल्याचं कविसंमेलनात सांगण्यात आलं. झालं वातावरण तापलं. मात्र, गालिब म्हणाले, तुम्हाला ज्या शेरमधून मी टीका केली असं वाटतं, ही माझ्या गझलेल्या अखेरच्या शेरची पहिली ओळ आहे. तेव्हा अनेकांना वाटलं, गालिब यांनी आपली चूक कबूल केली. त्यांनी उत्साहाच्या भरात गालिब यांना ती गझल पूर्ण म्हणण्याचा आग्रह केला. शेवटी गालिबच ते. त्यांनी आपल्या झब्ब्यातून कागद काढला. गझल सुरू केली.

हर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है
तुम्हीं कहो कि ये अंदाज़-ए-गुफ़्तुगू क्या है
न शो’ले में ये करिश्मा न बर्क़ में ये अदा
कोई बताओ कि वो शोख़-ए-तुंद-ख़ू क्या है
ये रश्क है कि वो होता है हम-सुख़न तुम से
वगर्ना ख़ौफ़-ए-बद-आमोज़ी-ए-अदू क्या है
चिपक रहा है बदन पर लहू से पैराहन
हमारे जैब को अब हाजत-ए-रफ़ू क्या है
जला है जिस्म जहाँ दिल भी जल गया होगा
कुरेदते हो जो अब राख जुस्तुजू क्या है
रगों में दौड़ते फिरने के हम नहीं क़ाइल
जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है
वो चीज़ जिस के लिए हम को हो बहिश्त अज़ीज़
सिवाए बादा-ए-गुलफ़ाम-ए-मुश्क-बू क्या है
पियूँ शराब अगर ख़ुम भी देख लूँ दो-चार
ये शीशा ओ क़दह ओ कूज़ा ओ सुबू क्या है
रही न ताक़त-ए-गुफ़्तार और अगर हो भी
तो किस उमीद पे कहिए कि आरज़ू क्या है
हुआ है शह का मुसाहिब फिरे है इतराता
वगर्ना शहर में ‘ग़ालिब’ की आबरू क्या है

गझल सुरू झालेली. सर्व रसिकांनी माना डोलावलेल्या. मात्र, गालिबच्या शेजारी बसलेला एक कवी कमालीचा अस्वस्थ होता. कारण गालिब जो कागद हातात घेऊन गझल म्हणत होते, तो कागद कोरा होता. या कविसंमेलनानंतर गालिब यांचं नाव देशभरात प्रसिद्ध झालं…अन् पुढे गालिब शेवटचा मोगल शासक बहादुर शाह जफर यांच्या दरबारात राजकवी झाले….

गालिब यांची पुस्तके…

– दीवान-इ-गालिब (1841) उर्दू
– कुल्लियत-इ-गालिब (1845) फारसी
– मिहर-ह-नीमरोज (1854) फारसी
– कातिअ-ह-बुर्हान (1861) फारसी
– कल्लियत-ह-नस्र (1868) फारसी
– उद-द-हिंदी (1868) उर्दू
– उर्दू-द-मुंआल्ला (1869)

इतर बातम्याः

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!