राज्यात चाललंय तरी काय? 24 तासांत विवाहितेसह 5 मुली बेपत्ता; सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण

बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलींचं प्रमाण वाढलं असल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे बेपत्ता झालेल्या मुलींचं किंवा महिलांचं नंतर काय होतं याबाबत कुठलीही माहिती समोर येत नाही.

राज्यात चाललंय तरी काय? 24 तासांत विवाहितेसह 5 मुली बेपत्ता; सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण
Buldhana police station
Image Credit source: Tv9
| Updated on: Mar 12, 2026 | 11:06 AM

बुलढाणा जिल्ह्यात मुलींसह विवाहित महिला अचानक बेपत्ता होण्याचं सत्र थांबता थांबत नाहीये. बुधवारी ‘टीव्ही 9’ने गेल्या 24 तासांत जिल्ह्यातून सहा महिला बेपत्ता झाल्याची बातमी दाखवली होती. त्यानंतर पोलीस विभागाकडून थातूरमातूर प्रेस नोट काढत गेल्या वर्षी बेपत्ता झालेल्या महिलांपैकी 87% महिला पोलिसांनी शोधून काढल्याचा दावा केला आणि स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. मात्र या प्रेस नोटमध्ये कुठलीही सविस्तर माहिती देण्यात आली नव्हती. बुलढाणा जिल्ह्यातून सरासरी दररोज पाच ते सहा मुली किंवा विवाहित महिला बेपत्ता होत आहेत. बुधवारी 24 तासांत जिल्ह्यातून एका विवाहितेसह पाच मुली आणि एक युवक असे सहा जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. मात्र यावर पोलीस प्रशासनाकडून कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही.

1 जानेवारी ते 10 मार्चपर्यंत जिल्ह्यातील 289 जण बेपत्ता झाले आहेत. त्यात 200 च्या वर महिलांचा समावेश आहे. बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलींचं प्रमाण वाढत असल्याने सर्वसामान्य पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. दुसरीकडे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील टिटोली रेल्वे क्वार्टर इथूनही दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. 14 आणि 11 वर्षीय मुलींना फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त होत आहे. या दोन मुली 10 मार्च रोजी दुपारी 1 वाजल्यानंतर घरातून अचानक गायब झाल्या आहेत. आईच्या फिर्यादीवरून इगतपुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. इगतपुरी पोलिसांकडून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

ऑपरेशन मुस्कान

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आलं आहे. बेपत्ता असलेल्या 121 अल्पवयीन मुला- मुलींना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं आहे. यापैकी काही अल्पवयीन मुली आणि मुलं प्रेम प्रकरणातून तर काही कुटुंबातील वादामुळे पळून गेल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांना ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून रेस्क्यू करून त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.

20 जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आलं आहे. यापुढेही ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येणार असून बेपत्ता असलेल्या मुला- मुलींच्या पालकांनी पोलिसांत तक्रार द्यावी असं आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांनी केलं आहे.

Follow Us