नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 जणांचा मृत्यू; शहरातील रस्त्यांवरून राज ठाकरे भडकले; म्हणाले, ‘माणसं मेल्याचं…’.
राज ठाकरे यांनी नाशिकच्या खड्ड्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. सत्ताधाऱ्यांना माणसं मेल्याचं गेल्याचं काही सोयरसुतक नाही, अशा शब्दात ठाकरेंनी टीका केली.

नाशिकमध्ये मागील काही दिवसांत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतरही रस्त्यावरील अपघात कमी होईना झाले आहेत. नाशिकमधील याच रस्त्याच्या खड्ड्यांमुळे वाढत्या अपघातावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. विरोधकांकडून आंदोलने देखील केली जात आहेत. आता यावरूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही रस्त्यावरील खड्ड्यांवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं आहे.
राज्यात कंत्राटदार जन्मालाच आले नाही – राज ठाकरे
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीनंतर आता पहिल्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा नाशिक दौरा होत आहे. राज ठाकरे यांचा नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका करताना म्हटलं की, ‘तुमच्या माध्यमातून आमच्या कानावर गोष्टी येताहेत. नाशिकमध्ये खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे माणसं गेली आहेत. परंतु येथील प्रशासन ढिम्म आहे. त्यांना माणसं मेल्याचं गेल्याचं काही सोयरसुतक नाही. त्यांना फक्त कमिशन कसे मिळेल हाच भाग आहेत. खरंतर अनेक कंत्राटदार गुजरातचे आहेत. महाराष्ट्रात कंत्राटदार जन्मालाच आलेले नाहीत, हा भाग आहे’.
लोक भाजपला निवडून देत असतील तर भोगा – राज ठाकरे
‘केंद्रातून आदेश येतील, त्यानुसार कुंभमेळे होताहेत. राज्यातील सर्व गोष्टी वरून आदेश आल्यावरच केल्या जाताहेत. या गोष्टी त्यांना लखलाभ असो. आम्ही केलेल्या गोष्टींच्या वाट लावल्या जाताहेत. दुसऱ्याने केली असल्याने वाट लावली जाताहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांचं काय झालं? सर्व स्मार्ट सिटी कुठे गेल्या? सर्व शहरं बरबाद होताहेत. ज्या प्रकाराने निवडणुका हाताळल्या जाताहेत, त्या फ्रॉड पद्धतीने हाताळल्या जाताहेत. लोकांनाही कळू लागलं आहे. मतदान करणाऱ्यांनाही या गोष्टी कळल्या पाहिजेत. नाशिकमध्ये झाडे तोडली जात असून याबाबत प्रशासन ढिम्म आहे. त्यानंतरही लोक भाजपला निवडून देत असतील तर भोगा. आम्ही अजून काय बोलू शकतो, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
