मुंबई-पुणे मिसिंग लिंकची निवडणुकीच्या फंडिंगसाठी घिसाडघाई; राज ठाकरेंच्या शिलेदाराचा CM फडणवीसांवर हल्लाबोल
बाळा नांदगावकर यांनी अमित साटम यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरील खड्ड्यावरून नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

महाराष्ट्रात मनसे विरुद्ध भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपच्या अमित साटम यांनी मुंबई महापालिकेत 25 वर्ष मनसे-ठाकरे गटाने मलिदा खाल्ल्याचा आरोप केला. अमित साटम यांनी राज ठाकरेंवरही जोरदार निशाणा साधला होता. अमित साटम यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी साटम यांच्याविरोधात आंदोलन केली जात आहेत. मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनीही भाजप आणि अमित साटम यांचा समाचार घेतला. यावेळी मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या खड्ड्ंयावरून नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मिसिंग लिंकचे उद्घाटन हे निवडणुकीच्या तयारीसाठी फंडिंगसाठी घिसाडघाई होती, अशा शब्दात त्यांनी टीका केली.
मनसेकडून आज सोमवारी चेंबूर स्टेशन परिसरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनदरम्यान मनसैनिकांनी भाजप नेत्याविरोधात रोष व्यक्त केला. यावेळी अमित साटम यांच्या प्रतिमेला जोडे मारले. या आंदोलनाला बाळा नांदगावकर यांनीही हजेरी लावली. मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर खड्ड्यांवर भाष्य करताना नांदगावकर म्हणाले, शिकारी जेव्हा नेम धरुन शिकार करतो. त्याला शिकारी म्हणतात. मात्र जो घिसाडघाई करतो, त्याचीच शिकार होते. निवडणुकीच्या तोंडावर फंडिंगसाठी मिसिंग लिंकची घिसाडघाई करण्यात आली. चांगल्या कामाचं श्रेय घ्या, पण त्याची जबाबदारीही घ्या’. तसेच मुंबईतील झाड कोसळण्याच्या घटनेवर म्हणाले, ‘झाडांचे ऑडिट झाले पाहिजे. मान्सूनपूर्व कामे होणे गरजेचे आहे’.
भाजपवर टीका करताना बाळा नांदगावकर म्हणाले, ‘मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आम्ही पाहिले आहेत. त्यांची कामे पाहिले आहेत. नवीन अध्यक्ष आले आहेत, त्यांना का म्हणून नेमलं, याची मला कल्पना नाही. त्यांची वर्तणुकीतून सत्तेचा माज दिसून येत आहे. त्यांची सत्ता कधीच जाणार नाही, अशा प्रकारचा माज आधीच्या अध्यक्षाकडून पाहिलं नाही. आधीच्या नेत्यांसोबत काम केलं आहे. आताची नेते अर्ध्या हळकुंडाने झालेली लोक आहेत. एखाद्या जबाबदारपदावर असताना त्याचं भान नसेल, तेव्हा अशा घटना घडतात’.
‘कोणत्या वेळेला काय वागायचं, कुठे हसायचं. कोणते हावभाव कुठे दाखवयाचे. याचं ज्ञान असण्याची आवश्यकता आहे. ते दिसलं नाही. त्याचं मनापासून वाईट वाटलं. हे प्रतिमात्मक आंदोलन आहे. शांततेत आंदोलन करत आहोत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना जबाबदारीतून मुक्त करायचं की, आणखी अडचणी वाढवून घ्यायच्या, हे त्यांनी ठरवावं. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ठरवावं. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी ताबडतोब अमित साटमांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी साटम यांनी केली.
महापौर रितू तावडे यांच्यावर टीका करताना नांदगावकर म्हणाले, ‘काम करणाऱ्या माणसाला सांगावं लागत नाही. चांगलं काम केलं तर माध्यम स्वत:हून दखल घेते’. अमित साटम यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेवर भाष्य करताना ते म्हणाले, ‘
कुणावर बोलावं. कसं बोलावं हे भान ठेवावं. आम्ही मुख्यमंत्री फडणवीस, पंतप्रधान मोदी, अमित शहांबद्दल बोलतो का? प्रत्येकानं पायरी ओळखून बोलावं’.