मुंबईसह एमएमआर रिजन गुजरातला जोडण्याचा डाव, राज ठाकरेंनी केंद्रीय मंत्र्याची पिसेच काढली; त्या विधानाचा घेतला समाचार

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 'आयआयटी बॉम्बे' नावावर केलेल्या विधानामुळे राजकीय वाद पेटला आहे. राज ठाकरे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा केंद्राचा डाव असून, 'बॉम्बे' नावाचा वापर करून शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

मुंबईसह एमएमआर रिजन गुजरातला जोडण्याचा डाव, राज ठाकरेंनी केंद्रीय मंत्र्याची पिसेच काढली; त्या विधानाचा घेतला समाचार
raj thackeray
| Updated on: Nov 26, 2025 | 12:05 PM

आयआयटी बॉम्बेचे आयआयटी मुंबई केले नाही यासाठी देवाचे आभार आहेत, असे वक्तव्य केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले. आयआयटी मुंबईच्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता याच मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यावर टीका केली आहे. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, ‘आयआयटीच्या नावातील बॉंबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं’. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय. आणि ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे, असा घणाघात राज ठाकरेंनी केला आहे.

आता तरी डोळे उघडा

खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे. या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना ‘मुंबई’ हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय, असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं

आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. ‘मुंबई’ नको ‘बॉंबे’च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे ! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच ! आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं, असे राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मुंबईतील आयआयटी मुंबई संस्थेच्या एका कार्यक्रमात हे विधान केले. आयआयटी बॉम्बेचे आयआयटी मुंबई केले नाही यासाठी देवाचे आभार आहेत. आयआयटीच्या नावातील बॉम्बे हे नाव तसेच ठेवले, त्याचे मुंबई केले नाही, हे खूप चांगले झाले, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले होते. यामुळे महाराष्ट्रात राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us