Maharashtra Rain Update : मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ

बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील बंधारा फुटल्याने आनंदगाव, मोगरा, उमरी या गावाचा संपर्क तुटला आहे.

Maharashtra Rain Update : मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ
पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल
Image Credit source: TV9
| Updated on: Jul 13, 2022 | 9:32 AM

मुंबई – महाराष्ट्रात (Maharashtra Rain Update) मागच्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. हवामान खात्याने (Meteorological Department) दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेक धरण भरली आहेत. तर काही धरण कधीही भरु शकतात अशी स्थिती आहे. पुढच्या दोन तासात मुंबई, ठाणे आणि रायगड आणि पालघरच्या काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोल्हापूर (kolhapur Rain Update) जिल्ह्यात मागच्या आठ दिवसांपासून मध्यम आणि मुसळधार पद्धतीचा पाऊस सुरु असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे तिथं एनडीआरएफचं पथक दाखल करण्यात आलं आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ कायम आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी पोहोचली 35 फूट दोन इंचावर त्यामुळे इशारा पातळीकडे वाटचाल झाली आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप कायम आहे. जिल्ह्यातील 54 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

बीड जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम

बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील बंधारा फुटल्याने आनंदगाव, मोगरा, उमरी या गावाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बंधारा फुटल्याने पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. बंधाऱ्याचे पाणी शेतात घुसल्याने शेतजमिनीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

नांदेडमध्ये पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे

संततधार पावसाने नांदेडमध्ये पैनगंगा नदी दुथडी भरून प्रवाहित झाली आहे. त्यामुळे सहस्त्रकुंड इथल्या धबधब्याचा रुद्रावतार पहायला मिळतोय. या पूरसदृश्य पाण्यामुळे हदगाव, हिमायतनगर आणि किनवट तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर या तिन्ही तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. त्याचबरोबर काही गावातील विद्युत पुरवठा देखील ठप्प झाला आहे. काल मध्यरात्री पासून सुरू झालेला पाऊस आज सकाळ पर्यंत सातत्याने सुरु आहे. त्यामुळे पैनगंगा नदीला पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

गिरणा नदीच्या पाणीपात्रात वाढ

गिरणा नदीला रात्री पुराच्या पाण्यात वाढ झाल्याने गिरणा नदीवरील आघार व चिंचावड शिवारातील सिद्धेश्वर बंधारा लगतच्या आठ दहा शेतकऱ्यांची दहा ते पंधरा एकर जमीन पाण्याखाली गेल्याने उभ्या पिकांसह जमिन वाहून गेली आहे.चिंचावड येथील दत्तात्रेय खैरनार, यांच्या सह आठ दहा शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या.ठेकेदाराकडून बंधाऱ्याचे काम वेळेत पुर्ण न झालयाने शेतकऱ्यांच्या जमिनी च्या बाजूने मातीचा भराव व संरक्षक भिंत न बांधल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसुल कडून पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आली आहे.