Gram Panchayat : मुलाच्या पराभवाचा वचपा शिंदे गटाच्या खासदाराने ग्रामपंचायत निवडणुकीत कसा काढला? जाणून घ्या

नाशिक जिल्ह्यातील चुरशीच्या लढतीपैकी 'ही' एक लढत महत्वाची मानली जात होती, यामध्ये ठाकरे गटावर शिंदे गटाने मात केली आहे. याशिवाय गोडसे यांनी घडवून आणलेला पराभव अधिक चर्चेचा विषय ठरत आहे.

Gram Panchayat : मुलाच्या पराभवाचा वचपा शिंदे गटाच्या खासदाराने ग्रामपंचायत निवडणुकीत कसा काढला? जाणून घ्या
Image Credit source: Google
| Updated on: Dec 20, 2022 | 2:28 PM

नाशिक : निवडणुका म्हंटलं की जय-पराजय असतो. मात्र, यामध्ये गावपातळीवरील निवडणुका या अधिक प्रतिष्ठेच्या होत असतात. यामध्ये जुन्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी नेहमीच चुरस पाहायला मिळत असते. अशीच एक लढत चर्चेत होती. त्यात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या मुलाच्या परभवाचा वचपा ग्रामपंचायत निवडणुकीत काढला आहे. नाशिक जिल्ह्यातील एकलहरे ग्राम पंचायत निवडणुकीत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना होता. यामध्ये ठाकरे गटाचे शंकर धनवटे तर शिंदे गटाकडून कविता जगताप यांच्यात सरपंचपदासाठी लढत होती. या लढतीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटाचे लक्ष लागून होते. त्यात हेमंत गोडसे यांच्या पॅनलच्या कविता जगताप यांनी बाजी मारली आहे. शंकर धनवटे यांच्याकडून खासदार हेमंत गोडसे यांच्या मुलाचा जिल्हा परिषदेत पराभव झाला होता. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत खासदार गोडसे यांच्या संपूर्ण कुटुंबाने मोठी ताकद या निवडणुकीत लावली होती.

हेमंत गोडसे हे खासदार होण्यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य होते. खासदार झाल्यावर हेमंत गोडसे यांनी त्यांचे पुत्र अजिंक्य गोडसे यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.

जिल्हा परिषद एकलहरे गटात हेमंत गोडसे यांच्या मुलाच्या विरोधात शंकर धनवटे यांनी निवडणूक लढवली होती, त्यात अजिंक्य गोडसे यांना पराभूत करून शंकर धनवटे विजयी झाले होते.

याच पराभवाचा धागा पकडून खासदार संजय राऊत यांनी गोडसे यांच्यावर टीका केली होती, स्वतःच्या मुलाला निवडून आणता येत नाही असे म्हंटले होते.

हेमंत गोडसे यांनी यावर बोलणं टाळत थेट कृतीतून उत्तर दिले आहे. हेमंत गोडसे यांनी शंकर धनवटे यांचा पराभव करत जुन्या परभवाचा वचपा काढला असून संजय राऊत यांच्या टीकेला सुद्धा उत्तर दिले आहे.

नाशिक जिल्ह्यातील चुरशीच्या लढतीपैकी ही एक लढत महत्वाची मानली जात होती, यामध्ये ठाकरे गटावर शिंदे गटाने मात केली आहे. याशिवाय गोडसे यांनी घडवून आणलेला पराभव अधिक चर्चेचा विषय ठरत आहे.